कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना शेतकऱ्याने घातली भावनिक साद...

"साहेब शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले, आता तुम्ही दिवाळी साजरी करा...

जनदूत टिम    10-Nov-2023
Total Views |
Maharashtra : Mumbai ; 
महाराष्ट्रातील दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दीपावलीपूर्वी पीक विम्याची मदत नाही मिळवून दिली, तर मी सुद्धा दिवाळी साजरी करणार नाही, अशी प्रतिज्ञा करणाऱ्या कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना आज शेतकऱ्याने "साहेब पीक विम्याचे पैसे मिळाले आहेत, आता तुम्ही दिवाळी साजरी करा" अशी भावनिक साद घातली विशेष म्हणजे दिवाळीची भेटवस्तू देत भावनिक पत्रसुद्धा दिले.

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना शेतकऱ्याने घातली भावनिक साद 
यावर्षी राज्य शासनाने एका रुपयात पीक विमा देण्याची घोषणा करून त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. मात्र पावसाने २१ दिवसापेक्षा जास्त खंड दिल्यामुळे या पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी पात्र ठरले. मात्र अनेक पिक विमा कंपन्यांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करत विम्याबाबत चालढकल, अपील केले. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिल्याशिवाय मी सुद्धा दिवाळी साजरी करणार नाही, अशी प्रतिज्ञा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती.
याबाबतची सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सार्वजनिक सभा आणि समारंभात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पुष्पगुच्छ व हारसुद्धा स्वीकारले नाहीत.
 
या दरम्यान २६ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान योजनेचा २००० रुपयांचा हप्ता थेट खात्यात वर्ग करण्यात आला. तसेच ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ देण्याचे मान्य करून रक्कम खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या माध्यमातून राज्यातील ३५ लाख शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपये वर्ग होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन सणासुदीच्या दिवसात थोडासा आधार मिळाला आहे.
 
दरम्यान याबद्दल गोविंद देशमुख या प्रगतशील शेतकऱ्याने कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना एक भावनिक पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. या पत्रासोबत त्यांनी दिवाळीची भेटवस्तू देऊन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना आता आपणही दिवाळी साजरी करा अशी साद घातली. शेतकऱ्याच्या या भावनिक पत्राने कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना अक्षरशः भरुन आल्याचे दिसून आले.
 
गोविंद देशमुख या प्रगतशील शेतकऱ्यांने कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना दिलेल्या पत्रातील मजकूर खालीलप्रमाणे...
 
"यावर्षी कुठे अतिवृष्टी झाली तर कुठे दुष्काळामुळे शेतकरी होरपळला. परंतु राज्याच्या कृषीमंत्रीपदावर आपण विराजमान असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला एक आशेचा किरण दिसला.
 
तुम्ही म्हणालात की, प्रधानमंत्री पीकवीमा योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत, तर मी सुद्धा दिवाळी साजरी करणार नाही. तेव्हाच आम्हाला वाटले की, आमच्या घरातीलच कोणी कृषीमंत्रीपदावर विराजमान आहे!
आपण शब्द पाळला, खरा करून दाखवला!
 
राज्यातील ३५ लाख शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपये वितरीत झाले. खुप खुप अभिनंदन !
 
आपल्या बीड जिल्ह्यात ७ लाख शेतकऱ्यांना २४१ कोटी रुपये मिळणार आहेत त्याबद्‌दल्ही आपले हार्दिक अभिनंदन !
आम्हाला खात्री आहे की, आपल्या पदाचा आपण असाच फायदा गोरगरीबांना मिळवून द्याल."