२०२१-२२ हे वर्ष “उत्पादकता वर्ष” म्हणून साजरे होणार -पालकमंत्री दादाजी भुसे

जनदूत टिम    04-May-2021
Total Views |

  • यावर्षी २५ कोटीचे पिक कर्ज वाटप करणार
  • फळभाज्या, रानभाज्या उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन
  • प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शासकीय योजना पोहचविण्यासाठी कृषी ग्रामविकास समितीची स्थापना

पालघर : गेल्या वर्षी साधारण २३ कोटी रुपयांचे पिक कर्ज शेतकरी बांधवांना वाटप करण्यात आले होते. या वर्षी त्यामध्ये वाढ करुन २५ कोटी रुपयापर्यंत पिक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी पालेभाज्या, तसेच औषधी गुणधर्म असलेल्या रान भाज्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ तात्काळ व एका छत्राखाली मिळण्यासाठी गावपातळीवर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली कृषी ग्राम विकास समितीची स्थापना करण्यात येणार आहे.
 
Dadaji Bhuse_1  
 
जिल्हा अन्न धान्यापासून स्वयंपर्ण करण्यासाठी तसेच शेतकरी बांधवांना शेती उत्पादन वाढविण्यासाठी २०२१-२२ हे वर्ष “उत्पादकता वर्ष” म्हणून साजरे करण्यात येणार असल्याचे कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी जाहिर केले. पालकमंत्री दादाजी भूसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगाम पुर्व बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. त्यावेळी भूसे बोलत होते.
 
यावेळी खासदार राजेंद्र गावित सर्वश्री आमदार श्रीनिवास वनगा, विनोद निकोल,(V.C द्वारे), सुनिल भूसारा (V.C द्वारे), जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी काशीनाथ तरकसे तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थि होते.
जिल्ह्यातील जवळपास १ लाख शेतकऱ्यांना बांधावर तूर लागवडीसाठी व भाजीपालाचे बियांणे तसेच वनपट्टे धारकांना फळबाग लागवड, शेतांची बांध दुरस्ती, भात लागवडी साठी प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा नियोजन समिती मार्फत अनुदान देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांपर्यंत विज पोहचली नाही अशा शेतकऱ्यांसाठी विद्युत जोडणी योजनेअंतर्गत विज उपलब्ध करुन देण्यासाठी योजनेची व्यापक प्रसार, प्रचार व जनजागृतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी वर्गापर्यत वीजजोडणी पोहचविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री भूसे यांनी सांगितले. शेती पुरक व्यवसाय करुण शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पिकणारे फळ, चिकू यावरील प्रक्रीया प्रकल्प वैयक्तीक शेतकरी किंवा शेतकरी गटांना देण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
 
जिल्ह्याची भौगोलिक रचना सागरी आणि डोंगरी असल्यामुळे नैसर्गिक आपत्तीचा सामना करत असताना शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते अशा शेतकऱ्यांना शासन वेळोवेळी मदत जाहिर करत असते. ज्या शेतकऱ्यांची मागील नुकसान भरपाई प्रलंबित असेल अशा शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तात्काळ देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना पालकमंत्री दादाजी भूसे यांनी दिले.
शेंद्रिय पिके आरोग्यास लाभदायक असतात तसेच खाण्यासाठी रुचकर असल्यामुळे नागरिकांमध्ये शेंद्रिय फळे, भाजीपाळा, पिके यांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. तसेच शेंद्रिय शेती मधून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. शेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना हवी ती मदत कृषी विभाग करेल आणि शेंद्रिय शेती करण्यास प्रोत्साहन देखील देईल. फळ रोपवाटीका मध्ये मजूरी काम करण्याऱ्यांना वेळेत मजूरी मिळण्यासाठी अशा मजूरांना महाराष्ट्र ग्रामिण रोजगार हमी योजनमध्ये सामाविष्ठ करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.
 
विकेल ते पिकेल या अभियांनाअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत सर्व भाजीपाला एकत्र करुन थेट ग्रांहकांपर्यंत पोहचविले जाणार आहे. तसेच कृषी विभागामार्फत महामार्गावर शेतकऱ्यांना स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. किसान रेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल थेट दिल्लीच्या बाजारपेठांमध्ये पोहचविण्यासाठी ग्रिन कॉरीडॉर च्या मध्यमातून कमीत कमी वेळामध्ये शेतकऱ्यांचा शेतीमाल दिल्लीच्या बाजार पेठामध्ये पोहचेल असे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.
यावेळी भात बिज प्रक्रिया या माहिती पत्रकाचे तसेच कृषी प्रसारण मोबाईल ॲपचे विमोचन पालकमंत्री दादाजी भूसे यांच्या हस्ते करण्यात आले.