सुधागडात रोगापेक्षा इलाज भयंकर

जनदूत टिम    30-Apr-2021
Total Views |

  • लसीकरणासाठी नागरिकांची पुरती दमछाक, रात्री 12 पासून प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर गर्दी; कोटा वाढवण्याची सुधागडवासीयांची मागणी

पाली/बेणसे (धम्मशील सावंत) : पाली सुधागडसह जिल्ह्यात कोरोनाची परिस्तिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबविली जात आहे, मात्र लस मिळविता मिळविता नागरिकांची पुरती दमछाक होत असल्याने रोगापेक्षा इलाज भयंकर असल्याचे संतापाने बोलले जात आहे.
 
kendra44_1  H x
 
सुधागड तालुक्यात पाली व जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केले जाते. पहिल्या आलेल्या 80 लोकांना टोकन दिले जाते. हे टोकन मिळविण्यासाठी 12 वाजल्यापासून लोक आरोग्य केंद्राबाहेर गर्दी करत आहेत. मात्र तरीही अनेकांना टोकन न मिळाल्याने त्यांना पुन्हा यावे लागत आहे. या प्रक्रियेत नियोजन व इतर बाबींसंदर्भात त्रुटी असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सुधागड तालुक्यातील लोकसंख्येच्या मानाने कोटा वाढविण्याची मागणी जोर धरतेय. पाली व जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केले जाते.
 
या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 100 जणांना म्हणजे एकूण 200 जणांना लस दिली जाते. 200 पैकी 40 लसी फ्रंटलाईन वर्कर्ससाठी राखीव ठेवल्या जातात. आणि 160 सर्वसामान्य नागरिकांसाठी दिल्या जातात. तालुक्याची लोकसंख्या पाहता ही संख्या खूप कमी असल्याने. नागरिकांची गैरसोय होते. यामुळे लसींचा कोटा व लसीकरण केंद्र वाढविण्याची आवश्यकता आहे. 45 ते 60 वयोगटातील नागरिकांना लस देताना प्रशासनाची कसरत पाहून 18 वयोगटातील लसीकरण मोहीमेचे काय होणार हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
 
पालीतील शाम खंडागळे यांनी सांगितले की पाली पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात 7 वाजता टोकण देण्यात येतात. पहाटे 5 वाजता टोकन घेण्यास गेलो असता 3 वाजताच 80 लोकांची नावे घेऊन कोटा पूर्ण केला गेलेला होता. हा अनागोंदी कारभार बंद झाला पाहिजे, या संदर्भात वैद्यकीय अधिकारी यांनी तत्परतेने लक्ष देणे गरजेचे आहे. असे देखील शाम खंडागळे म्हणाले. ओळखीच्या माणसांना आधीच कूपणचे वाटप केले जाते. मग लवकर येऊन रांगेत उभे राहिलेल्यांचा काय फायदा? याबाबत योग्य नियोजन केले पाहिजे असे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष अमित निंबाळकर यांनी सांगितले. तर ऋषी झा म्हणाले की खेडेगावातून येणाऱ्या लोकांची प्रामुख्याने वृद्धांची खूप गैरसोय होते. मी आईला घेऊन 2 ते 3 वेळा फेऱ्या मारल्या मात्र कुपन मिळाले नाही तर एकदा व्हॅक्सिन संपले होते. त्यामुळे अजूनही लस घेता आली नाही. अशा प्रकारचे अनुभव अनेक नागरिकांचे आहेत.
 मी देखील लस घेतली, मात्र त्यासाठी मोठी कसरत करावी लागली, टोकन घेण्यासाठी वारंवार लोकांना फेऱ्या माराव्या लागतात. टोकन घेण्यासाठी गर्दी झाल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची भीती आहे. आलेल्या सर्व लोकांना टोकन देऊन त्यांना लसीकरणाच्या तारखा दिल्या पाहिजेत. याबरोबरच एक लसीकरण झालेल्यांना पुन्हा टोकन घेण्यासाठी उभे राहण्यापेक्षा त्यांना देखील ठराविक तारखा द्याव्यात. लसीकरणासाठी योग्य नियोजन करावे.
- बशीर परबलकर, सामाजिक कार्यकर्ते, पाली
n दुपारी लसीकरण काम संपल्यावर त्याच दिवशी संध्याकाळी पुढील दिवसाच्या लसीकरणाचे टोकन नंबर दिले जावेत. जेणेकरून नागरिकांना रात्री बारा पासून सकाळी सात पर्यंत थांबावे लागणार नाही. आणि त्यांचा त्रास बंद होईल. यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोललो आहे.
- अभिजित चांदोरकर, पाली शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून गाव निहाय टोकन देण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच लसीकरण सुरळीत व्हावे व लोकांची गैरसोय थांबावी यासाठी ऍक्शन प्लॅन करत आहोत.
- दिलीप रायण्णावार, तहसीलदार, पाली-सुधागड
टोकन वाटप संदर्भात योग्य पारदर्शकता बाळगली जात आहे. सकाळी 6 वाजता टोकन देऊन आधारकार्ड नंबर व रजिस्टरवर नोंद केली जाईल. यापुढे एका व्यक्तीला एकच कुपन दिले जाणार आहे. लोकांना कळले की आता नंबर लागणार नाही तर ते गर्दी करत नाहीत निघून जातात व
पुन्हा येतात.
- डॉ. शशिकांत मढवी, तालुका वैद्यकीय अधिकारी