डॉ. जयंत नारळीकर यांचे विचार मराठी साहित्याला नवा आयाम देणारे ठरतील

जनदूत टिम    04-Feb-2021
Total Views |
मुंबई : सुमारे पाच दशकाहून अधिक काळ डॉ.जयंत नारळीकर यांच्या लेखनाने मराठी वाचकांना केवळ जगाचेच नव्हे, तर ब्रह्मांडाचे ज्ञान दिले. विज्ञानसाक्षर करणारी, माहिती देणारी असंख्य पुस्तके असतात. परंतु विज्ञानाला मानवी जगण्याचे नवे तत्व देऊन वाचकांना वैचारिक दिशा देण्याचे महत्वाचे काम डॉ.नारळीकर यांच्या साहित्याने केले आहे. आपणासारखा वैचारिक आणि विज्ञानवादी साहित्यिक या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभल्याने ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्य विचाराला नवा आयाम देणारे ठरेल असा विश्वास अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

CHAGAN_1  H x W 
 
नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्या पुणे येथील निवासस्थानी जाऊन त्यांना संमेलनाचे निमंत्रण दिले. यावेळी डॉ. नारळीकर यांच्या सुविद्य पत्नी सौ. मंगलाताई नारळीकर, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, मुकुंद कुलकर्णी, दिलीप साळवेकर आदी उपस्थित होते.
 
साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.जयंत नारळीकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून महाराष्ट्राचीच नव्हे, तर जगातील तमाम मराठी भाषिकांच्या जीवनशैलीचा महत्वाचा भाग बनलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचा खळाळता प्रवाह आजतागायत अखंड सुरू आहे.
आजवर झालेल्या ९३ साहित्य संमेलनांना लाभलेल्या अध्यक्षांच्या प्रतिभेने हा प्रवाह समृद्ध होत गेला. कविता, कादंबरी, नाटके, ललित, समीक्षा, प्रकाशने, संपादने यासह जगण्यातील सुख दु:खाचे असंख्य भावस्पर्शी पदर उलगडणाऱ्या या प्रवाहाने मराठी माणसाचे जीवन समृद्ध केले.
या सर्व भावभावनांच्याही पलिकडे जाऊन विज्ञानातील अद्भुत रहस्ये, मूलभूत तत्वे आणि त्याचा मानवी जगण्याशी असलेला कमालीचा उत्कट संबंध मराठी साहित्य प्रांतात अफाट क्षमतेने मांडून मराठी साहित्याला एक सशक्त, काळाच्या पुढची विलक्षण लखलखीत दिशा देण्याचे काम आपल्या लेखनाने केले आहे. म्हणूनच आम्हास हा अतिशय उचित गौरव वाटत आहे.
आम्ही सर्व नाशिककर आपल्या स्वागतासाठी अतिशय उत्सुक आहोत. आपल्या पत्नी सौ.मंगलाताई यांच्यासह आपणास संमेलनासाठी आमंत्रित करीत आहोत. नाशिकमध्ये आम्ही आपल्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे श्री.भुजबळ यांनी म्हटले आहे.