कोरोनामय पावसाळा आणि आपंत्ती व्यवस्थापन सज्जता

प्रविण डोंगरदिवे    07-Jul-2020
Total Views |
२०२० हे वर्ष संपूर्ण जगासाठी संकटाचे वर्ष ठरले आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच कोरानाच्या महामारीने संपूर्ण जगाला ठप्प केले. सुरुवातीच्या काळात कोरोना बाधितांच्या जागतिक आकडेवारीत भारत पाहिल्या १० देशांच्या यादी नव्हता मात्र आता भारतातील कोरोना बाधितांची संख्या इतकी वाढली आहे की, सध्या भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात सध्या मान्सून सुरु आहे.
 
corona1-1_1  H
 
कोरोनाशी लढा देतादेता सोबत विविध नैसर्गिक आपत्तींचाही सामना करावा लागतो आहे. परंतु कौतुकास्पद बाब अशी की, ज्या ताकदीने प्रशासन कोरोना सोबत लढत आहे. त्याच ताकदीने व तेवढयाच कौशल्याने नैसर्गिक आपत्तीचाही सामना केला जातो आहे हे विशेष होय. महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊसही पडतो आहे. एका बाजूला कोरोना आणि दूसऱ्या बाजूला नैसर्गिक आपत्ती अशा दोन्ही बाजू सांभाळत प्रशासन आपली कामगिरी पार पाडत आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्हयात आलेल्या “निसर्ग” चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान केले.
 
या वादळाचाही सामना प्रशासनाच्या मदतीने तेथील जनतेने केला. वादळानंतर झालेल्या नुकसानीची भरपाई आणि तातडीची मदत प्रशासनाने तात्काळ केली. गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना आलेल्या पुरात प्रचंड नुकसान झाले. त्याची पुनरावृत्ती होऊ नये या दृष्टीने या वर्षी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. मा. मुख्यमंत्री महोदयांनी पावसाळा सुरु होण्याआधीच विभागवार, जिल्हावार बैठका घेऊन व त्यात सबंधित डॉक्टर्सना सहभागी करून घेऊन पावसाळ्यातील रोगांसाठी चांगले नियोजन व आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला. कोरोना सोबत नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सुचनाही दिल्या. गेल्या वर्षीप्रमाणे सांगली-कोल्हापूरला यंदा पुराचा फटका बसू नये म्हणून महाराष्ट्रातील विविध धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याबाबत विशेष खबरदारी घेण्यात
येते आहे.
 
मेघदूत मोबाईल एप व उमंग मोबाईल एपवरुन जनतेला माहिती उपलब्ध
महाराष्ट्रात पावसाळा म्हटला की मुंबईतील पाऊस हा दरवर्षी ब्रेकिंगन्यूज असतो. यंदा मुंबईत तुंबणाऱ्या पाण्याची माहिती मिळण्यासाठी पूर इशारा यंत्रणा विकसित केली आहे. प्रभाग पातळीवर किती पाउस पडून पाणी पातळी किती वाढू शकते याची वेळीच माहिती तात्काळ मिळणार आहे. १४० पर्जन्यमापन केंद्रे सध्या असून शेतकऱ्यांसाठी मेघदूत मोबाईल ॲप व उमंग मोबाईल ॲपवरुन जनतेला माहिती उपलब्ध होईल. मुंबईतील हवामान विभागाशी संपर्क करण्यासाठी ०२२-२२१५०४३१/ ०२२- २२१७४९१७ या दूरध्वनींचा वापर करावा आणि ईमेलव्दोर संपर्क करण्यासाठी [email protected] या ईमेल पत्त्याचा वापर करावा.
 
ई-संजीवनी ओपीडीचे माबाईल ॲप कार्यान्वित
कोरोना आणि नैसर्गिक आपत्ती या संकटात सामान्य नागरीकांना वैद्यकीय सल्ला,आरोग्य तपासणीसाठी शानाने ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवा सुरु केली आहे. आता याच सेवेचे मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे.राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संगणक, लॅपटॉप यांचा वापर करून कुठल्याही आजारावर वैद्यकीय सल्ला, उपचार रुग्णाला घेता येतो. राज्यभरात आतापर्यंत ४ लाख ९ हजार ०६७ जणांनी या ॲपला भेट दिली असून सुमारे १८०० नागरिकांनी यासेवेचा लाभ घेतला आहे. ही सेवा आतापर्यंत केवळ संगणक आधारीत ॲप्लिकेशनवर असल्याने त्याच्या वापरावर मर्यादा होती. मात्र आता मोबाईल ॲप तयार झाल्याने त्याचा वापर सामान्यांकडून अधिक प्रमाणात वाढला आहे.केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचा या संयुक्त उपक्रमात ऑनलाईन ओपीडी सकाळी ९. ३० ते दुपारी १.३० या काळात उपलब्ध असून त्यासाठी रुग्णाकडून शुल्क आकारले जात नाही. रविवारी ही सेवा उपलब्ध नसते. आपल्या मोबाईल क्रमांकद्वारे नोंदणी केल्यावर ‘ओटीपी’ येतो. त्या माध्यमातून रुग्ण नोंदणी अर्ज भरतो. त्यानंतर टोकनसाठी विनंती केल्यानंतर आजारासंबंधी काही कागदपत्रे, रिपोर्ट अपलोड केले जातात. त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाला ओळखक्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होतो.लॉगईनसाठी एसएमएसद्वारे नोटीफिकेशन येते. त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळखक्रमांकाच्या आधारे लॉगईन करता येते. डॉक्टरांशी चर्चेनंतर लगेच ई-प्रिस्क्रीप्शन प्राप्त होते.
 
नवदल, एनडीआरएफ व लष्कर सज्ज
आपत्ती परिस्थीसाठी मुंबई, पुणे, नागपूर याठिकाणी नवदलाचे हॅलीकॉप्टर सज्ज करण्यात आले आहेत. तटरक्षक दल आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. या दलाचे ९ जहाजे तयार असून ८ एअरक्राफ्ट देखील आहेत. याशिवाय, मेरीटाईम नियंत्रण कक्षाच्या मदतीने संकटाशी मुकाबला करण्यासाठी हे दल सज्ज आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल एनडीआरएफ देखील आपत्तीच्या काळात परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारीत आहे. या दलाच्या १८ टीम्स असून (एका टीम मध्ये ४७ जवान असतात) मुंबई, नागपूर व पुण्यात त्या तैनात आहेत. बोटींची मर्यादा लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्याने त्यांच्याकडे रबरी बोटींचा आगाऊ साठा ठेवला आहे.
 
भारतीय लष्कराच्या ३९ कंपन्या या तयार ठेवण्यात आल्या आहेत. सेन्ट्रल कमांडिंग सेंटरमधून आपत्तीच्या वेळी सुचना मिळताच ते सज्ज हेातील. आपत्ती काळात लष्कर आणि प्रशासनाला माजी सैनिकांची मदत घेतली जाईल. एकूणच कोकण विभागात आणि महाराष्ट्रात कोरोना असो की नैसर्गिक आपत्ती याचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची सर्व जय्यत तयारी शासनाने पूर्ण केली आहे. जनतेचे सहकार्य आणि शासनाचे हात एकत्र आले की, कोणतेही संकट टाळता येऊ शकते हे तवढेच खरे !