मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या ‘आत्मनिर्भर महाराष्ट्र- आत्मनिर्भर भारत‘ या पुस्तकाचे आज मुंबई भाजपा कार्यालय, वसंत स्मृती, दादर मुंबई येथे विमोचन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या काळात देशातील गरीब, वंचितांपासून ते उद्योगांपर्यंत सर्वांना मदत करण्यासाठी आत्मनिर्भर अभियान जाहीर केले. हे अभियान नेमके काय, या पॅकेजमधून कोण आणि कसा लाभान्वित होणार, महाराष्ट्राला या पॅकेजमधून काय मिळणार याचे अतिशय सोप्या शब्दात त्यांनी या पुस्तकात विश्लेषण केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या संकेतस्थळावर सुद्धा हे पुस्तक उपलब्ध करून देण्यात आले आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषेत हे पुस्तक उपलब्ध करून देण्यात आले आहे. या कार्यक्रमाला माजी मंत्री आशिष शेलार, विनोद तावडे, खा. मनोज कोटक, रवींद्र चव्हाण, प्रसाद लाड आणि इतर नेते उपस्थित होते.