शेणवे : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी वृक्षारोपण होऊन त्यांचे संगोपन देखील होणे गरजेचे आहे.महाराष्ट्र शासन वनविभागाकडून दरवर्षी विविध वनक्षेत्र हद्दीत वृक्षारोपण केले जाते.
प्रत्यक्षात निसर्गाचे संवर्धन करणे हे केवळ वनविभागाचे कर्तव्य नसून प्रत्येक नागरिकाने हे कार्य शिरोधार्य मानून केलेच पाहिजे,तरच निसर्ग मनुष्याला भरभरून निसर्गसंपदा बहाल करेल. शहापुर तालुक्यातील मळेगाव गावातील तरुणांनी निसर्गसंवर्धनाचा वसा जपत माझं गाव आत्मनिर्भर गावं या संकल्पेतून राजेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक हजार वृक्षांची लागवड केली आहे.विशेष म्हणजे या वृक्षारोपणासाठी गावातील महिला वर्ग,पुरुष वर्ग प्रामुख्याने उपस्थित असून मळेगाव येथील तरुणांनी या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली होती.या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी लागणारी एक हजार रोपं ही महाराष्ट्र शासन वनविभागाकडून उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी वनविभागाचे आभार मानले आहेत.
वृक्षारोपण करणे हे मोठे पुण्याचे काम असून माणसाने निसर्गाचे संवर्धन करणे गरजेचे आहे.शहापुर तालुक्यातील सर्व गावांमध्ये माझं गाव आत्मनिर्भर गाव ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवून अशा प्रकारे वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.तसेच लोकसहभागातून गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहणार असल्याची माहिती मळेगाव येथील युवा ग्रामस्थ व वृक्षारोपण कार्यक्रमाचे मार्गदर्शक राजेश उबाळे यांनी दिली.