वंदेभारत अभियानांतर्गत मुंबई विमानतळावर आतापर्यंत ८४६५ प्रवाशांचे आगमन

12 Jun 2020 14:44:34
मुंबई: वंदेभारत अभियानांतर्गत ५५ विमानांमधून आतापर्यंत मुंबई विमानतळावर ८४६५ प्रवाशांचे आगमन झाले असून यात मुंबईतील प्रवाशांची संख्या २४८८ इतकी आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या २९१८ आहे तर इतर राज्यातील प्रवाशांची संख्या ३०५९ आहे.
 
Air-india_1  H
 
आतापर्यंत ब्रिटन सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांग्लादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगानिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार,टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड,केनिया, मियामी, व्हियतनाम, इटली, स्विडन,इथोपिया, रोम या देशातून प्रवाशी मुंबईत दाखल झाले आहेत. १ जुलै २०२० पर्यंत आणखी ५० विमानांमधून प्रवासी मुंबईत दाखल होतील.
 
महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी दिनांक २४ मे २०२० रोजी मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. त्याअनुषंगाने आलेल्या प्रवाशांना कॉरंटाईन करण्यात येत आहे. मुंबईतील प्रवाशांच्या संस्थात्मक कॉरंटाईनची व्यवस्था विविध हॉटेल्समध्ये करण्यात येत आहे. इतर राज्यातील व महाराष्ट्राच्या उर्वरित भागातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे. तिथे गेल्यावर त्यांना त्यांच्या जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्तांमार्फत कॉरंटाईन केले जात आहे.
 
इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. त्यांचा वाहतूक पास संबंधित राज्यातून प्राप्त होताच या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवले जात आहे. हे वंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीपणे राबवित आहे.
Powered By Sangraha 9.0