भेसळयुक्त बियाणांची विक्री करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार - कृषि मंत्री दादाजी भुसे

02 Mar 2020 20:28:39

भेसळयुक्त बियाणांची विक्री करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार - कृषि मंत्री दादाजी भुसे

जनदूत टिम
मुंबई : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पीक काढणी करण्यासाठी कंबाईंड हार्व्हेस्टींगचा वापर केला होता. यामुळे महाबिज मंडळ व शेतकरी यांना बियाणे पुरविताना अनावधानाने त्यात अगोदर शिल्लक असलेल्या दुसऱ्या सोयाबिन वाणाचे बियाणे मिसळले गेले असल्याने भेसळ आढळून आली. विद्यापीठांना एकत्रित कापणी न करण्याच्या सूचना देण्यात येतील. याचबरोबर खासगी कंपन्या भेसळयुक्त बियाणांचा पुरवठा करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधित कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत दिली.

bea_1  H x W: 0
 
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने भेसळयुक्त बियाण्यांचा पुरवठा केल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री भुसे बोलत होते.
मंत्री भुसे म्हणाले, या प्रकरणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निमयाप्रमाणे ३५ टक्के नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तसेच ७५ लाख रकमेचे नुकसान ज्यांच्यामुळे झाले त्यांच्याकडून ते वसूल करण्यात येणार असून, सोयाबिन बियाणे एमएयुएस ७१ आणि ६२ यांच्या एकत्रिकरणास जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री भुसे यांनी दिली. खाजगी कंपन्याच्या माध्यमातून बियाणे, किटकनाशके यांची भेसळ होत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बियाणांच्या भेसळसंदर्भातील कायदे केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली येत असून, राज्य शासनास त्याप्रमाणे कारवाई करावी लागते. भेसळीसंदर्भातील तक्रारी आल्यास उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती कार्यरत असून, या समितीस आलेल्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याच्या सुचना देण्यात येतील असेही मंत्री भुसे यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भारत भालके, सुनिल प्रभु, रणजीत कांबळे यांनी सहभाग घेतला.
Powered By Sangraha 9.0