शेतकऱ्यांनो धीर सोडू नका, नुकसान भरपाई देण्यासाठी शासन खंबीर – मुख्यमंत्र्यांची ग्वाही

जनदूत टिम    19-Oct-2020
Total Views |
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सकाळी पोहोचले. सांगवी येथील नुकसानीची पाहणी करून गावक-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
 
SOLAPUR_1  H x
 
नुकसानभरपाई देण्यासाठी शासन खंबीर आहे. गावक-यांनी धीर सोडू नये, अशा शब्दांत ठाकरे यांनी ग्वाही दिली. मुंबईहून विमानाने सोलापुरात दाखल झाल्यानंतर ठाकरे हे थेट अक्कलकोटकडे रवाना झाले. तेथील बोरी नदीकाठी असलेल्या सांगवी खुर्द व सांगवी बुद्रूक या दोन्ही गावांना जोडणा-या पुलावर जाऊन त्यांनी अतिवृष्टीने व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीची व पडझड झालेल्या घरांची पाहणी केली.
 
मात्र तत्पूर्वी, गावक-यांनी मुख्यमंत्र्यांनी पुलावरून नुकसानीची पाहणी न करता थेट गावात, बांधावर येऊन पाहणी करावी आणि तेथील अडचणी प्रत्यक्ष गावक-यांशी बोलून जाणून घ्याव्यात, अशी मागणी केली होती. जेथून मुख्यमंत्री ठाकरे हे दोन्ही गावांच्या शिवारातील नुकसानीची पाहणी करणार होते, तेथे गावक-यांना प्रवेश नाकारण्यात आला होता.तथापि, जेव्हा मुख्यमंत्री तेथे पोहोचले, तेव्हा त्यांनी पुलावर जाण्यापूर्वी गावच्या वेशीवर थांबून गावक-यांशी छोटेखानी संवाद साधला.
 
गावक-यांची निवेदनेही त्यांनी स्वीकारली. अतिवृष्टीने व पुरामुळे झालेले नुकसान प्रचंड मोठे असून जगणेच अवघड झाले आहे, आशा शब्दांत गावक-यांनी आपली व्यथा मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली. तेव्हा नुकसानभरपाई देण्यासाठी शासन खंबीर असून त्याप्रमाणे नुकसानभरपाई मिळणारच आहे. परंतु या संकटाशी सामना करताना गावक-यांनी धीर सोडू नये, जीवाचे बरेवाईट करून घेऊ नये, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अक्कलकोटच्या तहसीलदार अंजली मरोड यांच्याकडून नुकसानीच्या परिस्थितीची माहिती घेतली. त्यांच्या समवेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे आदी उपस्थित होते.