नवरात्री अन आम्ही

जनदूत टिम    16-Oct-2020
Total Views |
गणपती आले की जणू सणांची लाटच येते. सगळेच सण खूप आंनद देणारे, आपल्या रटाळ आयुष्यात थोडी प्रसन्नता आणणारे असतात असे मला वाटते. अगदी गरीब - श्रीमंत, दुःखी - सुखी सगळ्या सगाळ्यांसाठी खास असतात. आजपासून नवरात्री चालू होतील. जसे मी म्हटले की सगळेच सण खास असतात, पण गेल्या काही वर्षांपासून नवरात्री माझ्यासाठी जास्त जवळची झालीये. खरेतर नुसत्या माझ्यासाठी नाही तर आम्हा सर्वांसाठी.
 
santoshi_1  H x
 
आम्ही म्हणजे आम्ही सर्वजणी, आमचा रोजचा सकाळच्या लोकलचा ग्रुप. खरेतर रोज ट्रेनने प्रवास करणार्याचे, त्यातही दिवसाचे किमान ५ ते ६ तास प्रवासात घालवणाऱ्यांचे ग्रुप बहुतेक वेळा आपोआपच बनतात. सकाळच्या ट्रेनचा ग्रुप, संध्याकाळच्या ट्रेनचा ग्रुप असे वेगवेगळे ग्रुप बनतात. तर सांगायचे असे की हा माझा सकाळच्या ट्रेनचा ग्रुप माझ्यासाठी खूप जवळचा आहे जणू कुटुंबच अन त्यांच्यामुळे माझ्यासाठी हा नवरात्रीचा उत्सव सुद्धा खास होवुन गेलाय.
 
गणपती गेले की माझी नवरात्रीची तयारी सुरू होते. मम्मीचे पूर्ण कपाट उसकवून वर्किंग डेजसाठी साड्या काढायच्या, त्यातही गेल्या वर्षीच्या साड्यांपैकी एकही साडी रिपीट होता कामा नये याची विशेष काळजी घेतली जाते. कायेन्न एकवेळ भले आपण विसरू की गेल्यावर्षी कोणती साडी नेसली होती पण कोणी न कोणी तुम्हाला आठवण नक्की काढून देईलच की अगं, अमुक अमुक दिवशी हीच साडी नेसली होतीस ना" तेही अगदी विशिष्ट सुरात.
 
मग आपल्यालाच अपराधी वाटते बरेचदा, सो जर शक्य असेल तर आधीच काळजी घेतलेली बरी. मलातर खूप अप्रूप वाटते यांच्या समरणशक्तीचे, कुठल्याही रिमाईण्डर शिवाय सगळे बरोबर लक्षात असते यांच्या. असो, तर एकदाच्या साड्या ठरल्या की मग तयारी सुरू होते मॅचिंग अ‍ॅक्सेसरिजची, गळ्यातले, कानातले, बांगड्या, घड्याळे, नेलपेंट, लिपस्टिक, चपला, पर्स बापरे अगदी दमायला होते. पण त्या त्या दिवसाचे सेलिब्रेशन लक्षात घेता ते सगळे खूप आवडते देखील. एरव्ही साध्या वाटणाऱ्या कितीतरी जणी किती सूंदर आहेत, हे ह्या नऊ दिवसात चांगलेच जाणवते. थोड्याफार फरकाने अशी तयारी सगळ्याच जणी करतात, कारण हा उत्सव फक्त देवीचा नसून जणू समस्त स्त्रीयांचा असतो, अन त्या सगळ्याच खास असतात.
 
ही अशी स्वतःची तयारी करता करता बाकीची तयारी देखील करायची असते. म्हणजे वर्गणी किती काढायची, आरतीची पाने किती जणींकडे आहेत, ज्यांच्याकडे नाहीयेत त्यांच्यासाठी त्याची झेरॉक्स आणायची. अरे हो, या दिवसात आम्ही ट्रेनमध्ये आरती, देवीची गाणी गातो. अन त्यांनतर प्रसाद वाटतो. आमच्या या ग्रुपमध्ये आम्ही सर्व वेगवेगळ्या वयोगटाच्या आहोत, म्हणजे नुकतीच कॉलेजला जाऊ लागलेली ती ते निवृत्ती अवघ्या एखादं वर्षाची बाकी आहे ती , आर्थिक दृष्टीने अजूनही घरच्यांवर अवलंबून आहे ती ते भरगोस कमावणारी.
 
तरीही सगळ्याच जणी एकमेकींशी जोडलेल्या आहोत, एकमेकींसाठी खास आहोत अन ते क्रुतितुन जाणविते देखिल. एरव्ही आम्ही रोज सकाळी ७ वाजता भेटतो, काही जणी तर अगदी ट्रेन आल्यावर धावत पळत ट्रेन पकडतात, पण या दिवसात आम्ही सगळ्याच नटून थटून सव्वा सहाला भेटतो, मुद्दाम एक स्टेशन मागे जाऊन रोजची ट्रेन पकडतो, मग थोडी मजा मस्ती, सेल्फी-गृफी, गॉसिप, अन मग आरत्या - गाणी, प्रसाद वाटणे खूप मजा येते सगळ्याचीच. फक्त या काही तासांसाठी रविवारची सुट्टी देखील नकोशी वाटते. सगळी दुःखे, टेन्शन अगदी आजारपण देखील विसरायला होते यामुळे.
 
अन बघता बघता दसरा येतो. दसऱ्याला सगळ्यांनाच सुट्टी असल्यामुळे एक दिवस आधीच तो साजरा करतो. म्हणजे त्यादिवशी प्रसादा व्यतिरिक्त थोडा नाष्टा जसे जिलेबी, समोसे, फ्रुटी, पेढे आणतो. ट्रेन सजवायला फुले, तोरणं, पताका, देवीचा स्टिकर, हळद-कुंकू वगैरे वगैरे. सगळी कामे आधीच वाटून घेतलेली असल्यामुळे पटापट केली जातात. यादिवशी तर अगदी नाचगाणी देखील होतात तेही चालू ट्रेनमध्ये, नुसती धमाल. मग भरल्या मनाने हळूहळू एकमेकींचा निरोप घेतला जातो. तो क्षण मात्र प्रचंड हळवा असतो.घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत जणू स्त्री शक्तीचा विजय साजरा केला जातोय असेच वाटते. ह्या सणामुळे कित्येक दमलेल्या भागलेल्या , घर-संसार सांभाळण्यात स्वतःला विसरलेल्या तिला स्वतःसाठी थोडा वेळ मिळतो, नाही खरेतर तिच काढते तो वेळ तिच्यासाठी. कित्येक जणी यासाठी अगदी पहाटे चार वाजता उठून सगळे आवरून येतात. तरीही त्या दमलेल्या न वाटता उत्साही वाटतात. हिच तर आहे स्त्री शक्ती नाही का? अन आताच्या काळात तर बऱ्याच स्त्रीया खऱ्या अर्थाने सक्षम झाल्यात. स्वतःचे नशीब स्वतः घडवू लागल्यात. अन यासर्वाची एक छोटीशी झलक मलातरी या नवरात्री उत्सवात दिसून येते. अन हे फक्त ट्रेन असे नाही तर सगळीकडेच दिसून येते.