उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यासह राज्यातील अतिवृष्टीचा आढावा

15 Oct 2020 17:05:47

पंढरपूरच्या दुर्घटनेस जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

मुंबई : राज्याच्या कोकण, पश्चिम व मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, विदर्भासह अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेती व घरांचे नुकसान झाले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यातील विविध जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित जिल्हाधिकारी तसेच पालिका आयुक्तांकडून परिस्थितीचा आढावा घेतला.
 
Ajit Pawar_1  H
 
नुकसानीची माहिती घेतल्यानंतर नुकसानीचे पंचनामे तात्काळ सुरु करावेत. पंढरपूरच्या कुंभारघाटावरील भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील सहा जणांच्या मृत्यूची चौकशी करुन दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात राज्यातील पुरस्थितीचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अनेक वसाहतीत पाणी शिरल्याच्या व झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
 
उपमुख्ममंत्र्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन मदतकार्य तातडीने सुरु करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले. हवामानखात्याने दिलेल्या इशाऱ्याची नोंद घेऊन नागरिकांनी खबरदारी घ्यावी. पोलिस व प्रशासनाने सतर्क रहावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित जिल्हाधिकारी व पोलिस प्रमुखांना दिल्या आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सतर्क राहण्याचे व बचाव, मदतकार्य तत्परतेने करण्याचे निर्देश दिले आहेत.
Powered By Sangraha 9.0