Maharashtra : Thane ;
पीक कर्जाची वेळेवर परत फेड करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील बारा हजार शेतकऱ्यांना थकीत प्रोत्साहन पर अनुदान मिळणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री अजित पवार यांनी राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा केली आहे त्यामुळे थकीत अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान योजनेतून मिळणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानापासून ठाणे जिल्ह्यातील बारा हजारांहून अधिक शेतकरी वंचित असल्याबद्दल माजी आमदार गोटीराम पवार यांनी आवाज उठविल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री अजित पवार यांनी राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा केली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी बॅंकेचे वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आघाडी सरकारकडून प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. मार्च २०२३ पर्यंत तीन टप्प्यात अनुदान दिले जाणार होते. या घोषणेची पूर्तता झाली नसल्याबद्दल पवार यांनी खंत व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधले होते. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या अधिवेशनात दिली होती, याची आठवण पवार यांनी करून दिली होती. प्रोत्साहनपर योजनेत ठाणे जिल्ह्यातील सुमारे १२ हजार १४५ शेतकऱ्यांची पात्र म्हणून नोंदणी झाली आहे.
मुरबाड तालुक्यात प्रोत्साहन अनुदान योजनेमध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळविण्यासाठी आपल्या शेतकरी सेवा सोसायटीकडे संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे पवार यांनी केले आहे.