आचार्य अत्रे पुरस्काराने होतेय विजय वैद्य यांचे सहस्त्रचंद्र दर्शन !

योगेश वसंत त्रिवेदी    25-Aug-2023
Total Views |
२३ ऑगस्ट २०२३ ! ऐतिहासिक दिवस !! या दिवशी भारताच्या वैज्ञानिकांनी/शास्त्रज्ञांनी इस्रोच्या तळावरुन झेपावलेल्या चांद्रयान -३ चे चंद्रावर अवतरण होत आहे तर याच दिवशी 'चंद्र, सूर्य, भरती, ओहोटी आणि विजय वैद्य कुणासाठी थांबत नाही', अशी गर्जना करणाऱ्या ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री विजयकुमार दत्तात्रय वैद्य उर्फ विजय वैद्य यांचा संयुक्त महाराष्ट्र समितीच्या घणाघाती प्रहार करणाऱ्या 'मराठा'कार आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे यांच्या नांवाने देण्यात येणारा बहुप्रतिष्ठीत असा मुंबई मराठी पत्रकार संघाचा 'आचार्य अत्रे पुरस्कार' महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल नामदार रमेश बैस यांच्या शुभहस्ते मुंबई मराठी पत्रकार संघाच्या भव्य सभागृहात याच दिवशी प्रदान करण्यात येत आहे.

आचार्य अत्रे पुरस्काराने होतेय विजय वैद्य यांचे सहस्त्रचंद्र दर्शन 
 
हिंदु पंचांगानुसार अधिक मास पूर्ण होऊन लागलेल्या शालिवाहन शके १९४५च्या श्रावण शुद्ध सप्तमी म्हणजेच सीतला सप्तमी चा हा दिवस आहे. विजय वैद्य यांनी इंग्रजी दिनदर्शिकेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी २०२३ रोजी आपल्या वयाची ८१ वर्षे पूर्ण करुन ८२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. याचाच अर्थ लौकिकार्थाने मुंबई मराठी पत्रकार संघ राज्यपाल महोदयांच्या शुभहस्ते आचार्य अत्रे पुरस्कार विजय वैद्य यांना सन्मानपूर्वक प्रदान करीत त्यांचे जणू सहस्त्रचंद्र दर्शन घडवीत आहे. विजय वैद्य यांना महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या शुभहस्ते मिळणारा हा दुसरा पुरस्कार आहे.

आचार्य अत्रे पुरस्काराने होतेय विजय वैद्य यांचे सहस्त्रचंद्र दर्शन 
 
यापूर्वी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणी ने राज्यपाल महामहीम विद्यासागर राव यांच्या शुभहस्ते राजभवनातील प्रशस्त सभागृहात कृ. पां. सामक जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आजचा हा मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार राज्यपाल महामहीम रमेश बैस यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येत आहे. जव्हार या आदिवासी दुर्गम भागात दत्तात्रय आणि काकी वैद्य यांच्या पोटी जन्माला आलेल्या अपत्यांपैकी तीनही मुले चंद्रशेखर (यातही चंद्र आहेच), रवींद्र आणि विजय हे मराठी पत्रकारितेला ललामभूत ठरलेले ज्येष्ठ पत्रकार/राजकीय विश्लेषक. रवींद्र वैद्य पत्रकारिते बरोबरच समाजवादी नेते.

आचार्य अत्रे पुरस्काराने होतेय विजय वैद्य यांचे सहस्त्रचंद्र दर्शन 
 
भारतीय स्वातंत्र्य संग्रामात तसेच गोवा मुक्ती संग्रामात अहमहमिकेने सहभागी झालेले लढवैये नेते. नुकतीच २६ मे २०२३ रोजी वयाच्या ९० व्या वर्षी रवींद्र वैद्य यांनी इहलोकीची यात्रा संपविली. चंद्रशेखर हेही ज्वालाग्राही पत्रकारिता करणारे आणि विजय वैद्य हे ठाकरी बाण्याचे लढाऊ पत्रकार. ठाकरी बाण्याचे याचा अर्थ केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे आणि बाळ केशव उर्फ बाळासाहेब ठाकरे यांच्या परीसस्पर्श लाभलेल्या आणि आपली पत्रकारिता तसेच समाजसेवा सोन्यासारखी केलेले. सोनं हे भट्टीतून तावून सुलाखून बाहेर पडते तद्वतच विजय वैद्य यांची पत्रकारिता आणि समाजसेवा ही असंख्य संकटाचे, संघर्षाचे, अन्यायाचे घाव सोसून तावून सुलाखून तयार झाली आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि या लढ्याचा ज्वलंत इतिहास संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात शंभराहून अधिक स्लाईड शो संपूर्ण महाराष्ट्रात फिरुन जनतेला, विशेषतः नव्या पिढीला दाखविण्याचे शिवधनुष्य विजय वैद्य यांनी लीलया पेलले. जव्हारहून मुंबईत येतांना आणि बोरीवली येथे स्थायिक होण्यापूर्वी विजय वैद्य यांनी अक्षरशः भगवान दत्तात्रेय प्रमाणे त्रिस्थळी यात्रा केली.
 
तसेही ते दत्तात्रेय पुत्रच आहेत. लहान मुलांना पळवून नेण्याचे प्रकार सुमारे पन्नास वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर घडत होते. या लहान मुलांना पळविण्यात येते पण लक्षात कोण घेतो ? अशी परिस्थिती असतांना विजय वैद्य यांनी त्याचा जंगजंग पछाडून छडा लावण्याचा विडाच उचलला आणि अखेर केंद्र सरकार ला कायदा बनवावा लागला. लव मॅरेज आणि अरेंज मॅरेज असे प्रकार ऐकायला मिळतात. पण अशा प्रेम विवाहाच्या बेडीत अडकलेल्यांनी आपल्या चंद्रासम अर्धांगिनी ला सोडून देण्याचे प्रकार घडले. अशा पैकी अनेकांना एकत्र आणून पुनश्च हरी ओम म्हणायला लावून संसाराचा गाडा रुळावर आणण्याचे काम सुद्धा विजय वैद्य यांनी केले. बाळासाहेब ठाकरे यांनी ११ जून १९६६ रोजी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना स्थापन केली. परंतु ही संघटना स्थापन होणार अशी बातमी विजय वैद्य यांनी त्यापूर्वीच निळूभाऊ खाडिलकर यांना सांगून नवाकाळ च्या पहिल्या पानावर प्रसिद्ध केली. दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे हेही अचंबित झाले. त्यांनी आपल्या खास शैलीत वैद्य यांना विचारले, काय रे विजय ? ही बातमी तुला कोणी दिली ? वैद्य म्हणाले, साहेब, तुम्हीच दिलीत.
 
चेंबूर येथील वसंत व्याख्यानमालेत तुम्हीच याची घोषणा केली होती. ही व्याख्यानमाला आयोजित केली ती सुद्धा विजय वैद्य यांनीच. चेंबूर, सांताक्रूझ करता करता वैशाली आणि विजय वैद्य यांचा संसार महाराष्ट्र गृहनिर्माण संस्थेच्या बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगरात ११/८५४ नंबरच्या इमारतीत चाळीस वर्षांपूर्वी सुरू झाला. हीच त्यांची आज खऱ्या अर्थाने कर्मभूमी झाली आहे. या जय महाराष्ट्र नगर उर्फ टाटा पॉवर च्या भागात चाळीस वर्षांपूर्वी मागाठाणे मित्र मंडळ स्थापन केले. या मागाठाणे मित्र मंडळातर्फे प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय उभे केले. एकता विनायक मित्रमंडळ च्या विद्यमाने उपनगरचा राजा हा मुंबई उपनगरातील सर्वात मोठा गणेशोत्सव सुरु केला. मुंबईतील सुविख्यात शिल्पकार विजय खातू यांनी सुमारे पंचवीस फूट उंच श्रींची मूर्ती याच ठिकाणी बनविण्याचा प्रघात सुरू केला. दुर्दैवाने विजय खातू आज आपल्यात नसले तरी त्यांची कन्या रेश्मा स्वतः जातीने या ठिकाणी येऊन आपल्या बाबांची परंपरा पुढे चालवीत आहे. वसंत व्याख्यानमाला सुद्धा विजय वैद्य यांनी चाळीस वर्षांपूर्वी याच जय महाराष्ट्र नगरात गृहनिर्माण मंडळाच्या दोन इमारतींच्या मोकळ्या जागेत सुरू केली. या वसंत व्याख्यानमालेतून असंख्य सामाजिक कार्यकर्ते विजय वैद्य यांनी घडविले आहेत.
 
जय महाराष्ट्र नगर भूषण आणि शारदा पुरस्काराने अनेकांना सन्मानित केले. अनेकांच्या पाठीवर प्रोत्साहनाची थाप मारुन विजय वैद्य यांनी अनेक नररत्ने समाजाला प्रदान केली. बोरीवली चा संपूर्ण इतिहास खडानखडा माहित असलेला आणि स्वतःच्याच मस्तीत वावरणारा अवलिया म्हणजे विजयकुमार दत्तात्रय वैद्य ! ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे सतत तीन वर्षे अध्यक्षपद भूषवून हॅट्ट्रिक जशी विजय वैद्य यांनी केली तद्वतच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदाची हॅट्ट्रिक सुद्धा विजय वैद्य यांच्या नावावर नोंदविण्यात आली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात उपाध्यक्ष पदापर्यंत पोहोचलेल्या विजय वैद्य यांनी प्रत्येक संस्था संघटनेत वाचनालय/ग्रंथालय याकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे. ठाणे जिल्हा पत्रकार संघात तर अर्धी चड्डी आणि बनियनवर रात्र रात्र जागून ग्रंथालयात पुस्तके लावण्याचे काम केले.
 
ठाणे जिल्हा पत्रकार संघातर्फे चार जिल्ह्यांतील पत्रकारांचे ऐतिहासिक दोन दिवसांचे शिबिर अंबरनाथ येथे भरविण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचलले होते आणि अटलबिहारी वाजपेयी हे परराष्ट्र मंत्री असतांना माधवराव गडकरी हे एकमेव मराठी पत्रकार त्यांच्या समवेत चीन दौऱ्यावर गेले होते. तेथून त्यांना थेट अंबरनाथ येथे ठाणे जिल्हा पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी आणण्याचे काम विजय वैद्य यांनी केले. जव्हारला आठ वर्षाचे असतांना आचार्य प्रल्हाद केशव अत्रे लिखित 'साष्टांग नमस्कार ' या नाटकात चंदूची भूमिका केली होती तर ठाण्यात मो. ह. विद्यालयात शिकत असतांना आचार्य अत्रे यांना जवळून पाहण्याचा योग आला. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात ठाण्याच्या तलावपाळी जवळील शिवाजी मैदानात आचार्य अत्रे यांची अनेक वेळा घणाघाती भाषणे ऐकण्याची संधी मिळाली.
 
आचार्य अत्रे यांच्या मराठा दैनिकाचे चाहते बनले. त्यामुळे आचार्य अत्रे यांच्या नांवाने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे विजय वैद्य यांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. विजय वैद्य यांच्या सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्वाला मुंबई मराठी पत्रकार संघाने आचार्य प्रल्हाद केशव उर्फ आचार्य अत्रे पुरस्कार राज्यपालांच्या शुभहस्ते प्रदान करण्याचा सर्वानुमते निर्णय घेऊन विजय वैद्य यांचा आणि पर्यायाने या पुरस्काराचा बहुमानच केला आहे. याबद्दल मुंबई मराठी पत्रकार संघाच्या संपूर्ण कार्यकारी मंडळाचे आणि निवड समितीचे मनःपूर्वक अभिनंदन ! श्री. विजय वैद्य यांना महामहीम राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे, यानिमित्ताने राज्यपाल महोदयांना एक नम्र आणि कळकळीची विनंती की, विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त जागा रिक्त आहेत. त्यात एक श्री. विजय वैद्य यांची नियुक्ती विधानपरिषदेवर करुन लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा गौरव वाढवावा. विजय वैद्य यांना शतकी खेळी खेळण्याचे भाग्य लाभो आणि अधिकाधिक पुरस्कार प्राप्त होत आपल्या शिरपेचात मानाचे तुरे खोवण्यात येवोत, हीच जगन्नियंत्याकडे प्रार्थना ! -योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१.