जळगावात मध्यान्ह भोजन योजनेत १०० कोटींचा घोटाळा, सुषमा अंधारेंचा ‘या’ दोन नेत्यांवर आरोप...

जळगावात मध्यान्ह भोजन योजनेत १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

जनदूत टिम    25-Jul-2023
Total Views |
Maharashtra: Jalgaon ; 
महाराष्ट्रातील बांधकाम कामगार आणि वेठबिगारांसाठी राज्य सरकारची मध्यान्ह भोजन योजना सुरू आहे. या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचं वृत्त एका मराठी वर्तमान पत्राने प्रसिद्ध केलं होतं.

जळगावात मध्यान्ह भोजन योजनेत १०० कोटींचा घोटाळा 
 
या वृत्ताचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडून या योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली होती. एकनाथ खडसे यांनी यावेळी जळगाव जिल्ह्यात मध्यान्ह भोजन योजनेवर खर्च कलेल्या मार्च आणि एप्रिल २०२३ मधील खर्चाची आकडेवारी मांडली होती.
 
दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन मध्यान्ह भोजन योजनेवर खर्च केलेल्या गेल्या सात ते आठ महिन्यांच्या खर्चाची आकडेवारी मांडली. ही आकडेवारी सादर करत अंधारे यांनी तब्बल १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. पत्रकार परिषदेत अंधारे यांनी या घोटाळ्याप्रकरणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे बोट दाखवलं. गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्रीसुद्धा आहेत.
सुषमा अंधारे म्हणाल्या, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये साधारतः अडीच ते तीन हजार बांधकाम कामगार असावेत. परंतु आम्ही माहितीच्या अधिकारांत जळगाव जिल्ह्यासंबंधीची माहिती मागवली असता आम्हाला सांगण्यात आलं की, एकट्या जळगावात ३५ ते ४० हजार कामगार मध्यान्ह योजनेचा लाभ घेत आहेत. खरंतर कुठल्याच जिल्ह्यात इतके बांधकाम कामगार नसतात. तरीदेखील त्यांनी इतका मोठा आकडा सांगितला.
 
सुषमा अंधारे म्हणाल्या, मध्यान्ह भोजन योजनेवर १४ ते ३० सप्टेंबर या १५ दिवसांमध्ये ५८.६४ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. तर ऑक्टोबर महिन्यात हाच खर्च वाढून २ कोटी ८७ लाख रुपये इतका वाढला आहे. हा खर्च पुढच्या काही महिन्यांमध्ये अनेक पटींनी वाढला. एकट्या फेब्रुवारी महिन्यात मध्यान्ह भोजन योजनेवर ७ कोटी ९९ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. तर मार्च आणि एप्रिल महिन्यात या योजनेवर २५.२७ कोटी रुपये खर्च झाला आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यात या योजनेचे इतके लाभार्थी कसे काय? ते कोण आहेत, कुठून आले? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
 
सुषमा अंधारे म्हणाल्या, या योजनेतील लाभार्थ्यांची यादी आम्ही मागवली. या यादीत ज्यांची नावं आणि फोन नंबर होते त्यांना आम्ही फोन केले. तर हे लोक आमच्याशी गुजराती भाषेत बोलू लागले. आम्ही गुजरातमध्ये राहतो. कधी महाराष्ट्रात आलोच नाही, अशी उत्तरं आम्हाला मिळाली. तर काही लोकांनी सांगितलं आम्ही कर्नाटकमध्ये राहतो. त्यामुळे हे सगळे लाभार्थी खोटे असून योजनेवर खर्च झालेले कोट्यवधी रुपये कुठे गेले असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.