माणसाची बुद्धी गंजते?

पुष्पा लेले     18-Jul-2023
Total Views |
संगणक कसा चालतो? त्यामध्ये काय आहे की त्यामुळे त्याला माणसाची बुद्धी असल्याचा भास निर्माण होतो? सगळेच तंत्रविज्ञान माणसाने स्वत:साठी निर्माण केले आहे. पण संगणक माणसाला सल्ला देतो असे दिसते.

माणसाची बुद्धी गंजते
 
त्यामुळे हे शास्त्र काही वेगळे आहे. निश्चितच विज्ञान खूप प्रगत झाले आहे. तेव्हा सगळ्यांना सगळे तपशीलवार कळले पाहिजे असे नाही. पण आपल्याला ह्यातले काय कळणार? ही भावना असता कामा नये. संगणकाचे उत्पादन, त्याची क्षमता, त्याचा उपयोग हे इतक्या झपाट्याने वाढत आहे की आपल्याला पटो वा न पटो पण हे तितकेच सत्य आहे की आपण संगणक युगात आहोत. त्याच्या उपयोगाबाबत आणि कार्याबद्दल भरपूर मतभेद असतील. तरी सुद्धा त्याकडे पाठ फिरवून चालणार नाही. लवकरच हे यंत्र आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग होणार आहे. हे एक अनोळखी यंत्र आपले हातपाय पसरत आहे. संगणक बनविणे, वापरणे सगळ्यांनाच शक्य नाही. त्यासाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक ठरेल. आपल्याला तो कमीतकमी इतका उमगला पाहिजे की आपण त्याच्याकडे साधन म्हणून तरी बघू शकू.
 
त्या यंत्राला संगणक म्हणून नांव जरी असले तरी गणिताखेरीज अनेक विषय आपल्या पोटात ठेवू शकतो व वेळोवेळी त्या विषयाची माहिती तो पुरवू शकतो. माहिती देणारा अनुपस्थित असूनसुद्धा ती माहिती ह्या यंत्रावर मिळू शकते.
आधुनिक समाजात लोकसंख्या, श्रम, पैसा, व्यवसाय, उत्पादन साधन, संपत्ती हे इतके आवाक्याबाहेर गेले आहे, की त्याची माहिती उपलब्ध होणे, व ती माहिती कमी खर्चात व वेळेत उपलब्ध व्हावी ह्यासाठीच ह्या यंत्राची गरज भासली. अशा तऱ्हेने एक यंत्र ह्या नात्याने संगणकाच्या जवळपास पोहोचणे आवश्यक आहे. हे एक माहिती पुरवणारे यंत्र आहे. ह्यामध्ये ज्ञानाचा, माहितीचा साठा कायम उपलब्ध असतो. संगणकामध्ये चिन्हांना फार महत्त्व असते. त्याचा जेवढा खोलवर विचार करावा तेवढी त्यात व्यवस्था व पद्धती आढळून येते. हे संकेत विशेष ज्ञानींनाच अवगत असतात. संगणकाचे सर्किटमधून अनेक संदेश असतात व संगणकात माहिती व वस्तू यांचा एकच धागा असतो. हे एक आपोआप चालणारे यंत्र आहे. संगणक हा एक चक्रव्यूह आहे व तो अनेक छोट्या व्यूहांपासून बनलेला असतो. गोल जोडणीमुळे तो स्वयंपूर्ण बनतो.
 
संगणक चालविणे म्हणजे त्याला कार्यक्रम पुरविणे. हल्ली भाषांतर देखील संगणकावर होते. संगणकातला पत्ता हा पिनकोड सारखा असतो. संगणक म्हणजे बऱ्याच उपकरणांची एक व्यवस्था असते. प्राथमिक स्वरूपाच्या सूचना कार्यवाहीत आणण्याची क्षमता संगणकामध्ये आहे. त्याला तयार कार्यक्रमांची जोड देऊन त्याला समृद्ध बनवावे लागते. हे कार्यक्रम म्हणजे सुद्धा एक सामग्रीच असते. अशा सामग्रीलाच माहितीरूप सामग्री म्हणजे सॉफ्टवेअर असे म्हणतात. माहितीरूप सामग्री विशिष्ट तऱ्हेने संघटित केलेली असते. एकूणच तंत्रविज्ञानातली अनेक तत्त्वे कॉप्युटरला लागू पडतातच. ह्या व अशा अनेक मूलतत्त्वावर संगणक आधारलेला असतो. प्रत्येक पातळीवरचा माणूस प्रमुख असतो व बाकी त्याला मदतनीस असतात. हे क्षेत्र जास्तीतजास्त विस्तारत चालले आहे.
 
पण ह्याचा उपयोग जर आंधळेपणानी वाढवला तर यात जरूर काही धोके आहेत. सामाजिक प्रश्नांचे भान ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे. जी कामं आपल्या बुद्धी बाहेर अथवा कुवती बाहेर असतात त्याकरता विज्ञान या यंत्राची जोड घेणे वेगळे. पण जी कामे मनुष्य करू शकतो ती कामेही यंत्रावर टाकणे कितपत योग्य आहे? त्यामुळे रोजगार कमी होण्याची भीती संभवते. त्याच प्रमाणे माणसाची विचारशक्ती, बुद्धी याला संपूर्ण विश्रामच मिळेल व मेंदूला खरंच गंज येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बेकारी वाढणार नाही असे गृहीत धरून चालले तरी हा बदल होताना कामगार कपात, बदल्या, नव्या नेमणुका, प्रशिक्षण ह्यावरून वाद निश्चितच निर्माण होतील व ते सोडविणे एक जटिल समस्या होऊ शकेल. संगणकामुळे बौद्धिक विचारवंत, चिकित्सक, तंत्रज्ञ ह्यांच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेला कितपत चालना मिळेल? संगणकाचे तोटेतर निश्चितच आहेत. १० माणसांचे काम एक यंत्र करत असल्याने बाकी ९ जणांवर बेकारीची समस्या तर येणारच.
 
अशा प्रकारे जसे त्याचे फायदे आहेत तसेच तोटे किती आहेत ह्याचाही विचार होणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी माणसांची पावकी, निमकी, पाऊणकी, तोंडपाठ असायची. पण हल्ली २ ते ३० पाढे सुद्धा मुलांना म्हणता येत नाहीत. त्याचे कारण काय? तर बेरजा, वजाबाक्या, भागाकार, गुणाकार हे सर्व यंत्रच करून देतात. त्यामुळे बुद्धिमान मुलांना बुद्धी वापरण्याची संधीच मिळत नाही. २४ तास संगणकापुढे असल्याने विचार करण्याची शक्तीच (creativity) लुप्त होत चालली आहे व त्यामुळे खोल विचार केला तर खरंच हा प्रश्न सतावत राहतो की ह्या संगणकामुळे माणसाच्या मेंदूची शक्ती कमी होण्याची शक्यता आहे.