कॉ. जयवंत पाटील यांची कारकीर्द म्हणजे लोकांसाठी संघर्ष - कॉ प्रकाश रेड्डी

जनदूत टिम    17-Jun-2023
Total Views |
मुंबई :
स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतरही मुंबई हे औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर महाराष्ट्राची राजधानी म्हणून निर्माण झालेल्या या शहराचा पायाभूत विकास व्हावा यासाठी निर्भीडपणे व अभ्यासपूर्ण भाषणांनी ज्यांनी सभागृहात आणि स्वच्छ चारित्र्याने जनमानसावर छाप पाडली अशा दिवंगत कॉम्रेड जयवंत पाटील यांची जन्मशताब्दी प्रभादेवीकर वर्षभर साजरी करणार आहेत, लोकांचा हा व्यक्त होणारा कृतज्ञता भाव म्हणजेच त्यांच्या कार्याला मिळालेली पोचपावती आहे असे उदगार महाराष्ट्रातील ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी काढले. प्रभादेवी येथील आगरी सेवा संघाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

dr. jayvant 
 ते पुढे असेही म्हणाले की, कॉ. जयवंत पाटील यांची कारकीर्द म्हणजे लोकांसाठी संघर्ष असलेला तो काळ होता. मधू दंडवते यांनी दादरमधून निवडणूक लढण्याचा हट्ट त्यावेळी सोडला असता तर अल्प मतांनी पराभूत झालेले कॉ जयवंत पाटील लोकांचा एक आमदार म्हणून सभागृहात गेले असते. मुंबईतील मध्यवस्तीतील गिरणगावात झोपडपट्टी, चाळी, गल्लीबोळात जाऊन लोकांसाठी अहोरात्र काम केल्यामुळे कॉ. जया पाटील, कॉ मणिशंकर कवठे, कॉ गणाचार्य, कॉ प्र के कुरणे यांच्यासारखे कार्यकर्ते सातत्याने निवडून येत असत, परंतु ८२ च्या गिरणी संपानंतर मुंबई शहराची ओळख औद्योगिक राजधानी ऐवजी आर्थिक राजधानी म्हणून झाली, त्यानंतर झालेली भ्रष्ट राजकारणी व माफियांची युती यांनी अनेक चळवळी दडपल्या. मुंबईतील लोकांच्यासाठी आवाज उठविणाऱ्या संस्था वा राजकीय पक्ष यांची मुस्कटदाबी केली त्याचा परिणाम एकेकाळी दिमाखाने फडकणाऱ्या लाल बावट्यावर सुद्धा झाला आहे हे नाकारून चालणार नाही. संसदीय राजकारणावर विश्वास असलेल्या करोडो लोकांचा लवकरच भ्रमनिरास होणार असून भविष्यात पुन्हा बळ मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तर प्रमुख पाहुणे म्हणून असलेले कॉ मिलिंद रानडे म्हणाले, महाराष्ट्र हे कम्युनिस्ट चळवळीची प्रदीर्घ आणि गौरवशाली परंपरा असलेले राज्य आहे.
 
त्याला ब्रिटीश साम्राज्यवाद्यांशी स्वातंत्र्यासाठी केलेल्या संगराचा वैभवशाली वारसा आहे. या लढाईत कित्येक कम्युनिस्टांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार आणि शेतकऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. आजचा काळ हा गरिबांना जगण्यासाठी अधिक कष्ट करायला लावणारा, मुख्य प्रश्न बाजूला ठेवून राम मंदिर, औरंगजेब, लव्हजिहाद यासारखे भावनिक धार्मिक तेढ वाढीस लावणारे प्रश्न उकरून काढून एका बाजूने देशवासियांना अडाणी आणि दुसरीकडे अंबानी - अदानी सारख्या उद्योगपतींना अधिक श्रीमंत करणारे हे सरकार आहे. अडाणी अधिक श्रीमंत कसा झाला याचा शोध सामान्यांनी घ्यायला हवा आणि त्यानंतर मुखंडपणा सोडून संबंधितांना जाब विचारायला हवा. या देशातील जनतेने काय बघायचे, काय वाचायचे, काय लिहायचे आणि कसे वागायचे हे सतत खोटं बोलणारी सत्तापिपासू लोकं ठरवीत आहेत. सर्व क्षेत्रांवर होणारे हे आक्रमक थोपविण्यासाठी संघटनात्मक पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे.
 
जयवंत पाटील यांची कारकीर्द म्हणजे संघर्ष आणि क्रांती या कल्पनांनी झपाटलेला तारुण्याचा तो काळ ! मुंबईतील गिरणी कामगारांच्या लाल-बावटयाने गाजवलेला तो काळ, मोल, मजुरी आणि भांडवल यांच्यातील वर्गयुद्धाने सा-या मुंबईच्या जीवनावर त्या काळी चैतन्यमय राजकीय प्रभुत्वाची झिंगच चढली होती. त्याला कारणेही तशीच सबळ होती.
पत्रकार अशोक कारखानीस आपल्या भाषणात म्हणाले, मुंबईतील गिरणी कामगारांच्या लाल-बावटयाने गाजवलेला तो काळ, मोल, मजुरी आणि भांडवल यांच्यातील वर्गयुद्धाने सा-या मुंबईच्या जीवनावर त्या काळी चैतन्यमय राजकीय प्रभुत्वाची झिंगच चढली होती. त्याला कारणेही तशीच सबळ होती.
 
भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गोवा मुक्तीचा लढा आणि नंतर झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढयात कम्युनिस्ट पक्षाने जी महत्त्वाची भूमिका पार पाडली त्यामध्ये जयवंत पाटील अग्रभागी होते. १९५७ च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीने जो प्रचंड विजय मिळवला त्यात जयवंत पाटील महापालिकेवर निवडून आले.
मुंबई महापालिकेतील त्यांच्या कार्याने त्यांनी आपल्याच विभागात नव्हे तर एक निर्भिड, लढाऊ, सर्वसमावेशक नेता म्हणून सा-या मुंबईतील नागरिकांमध्ये त्यांनी सर्वमान्यता मिळवली होती.
 
मोकळ्या मनाचा, सामंजस्य जोपासणारा, लोकसंग्रहात रमणारा; पण लोकहितासाठी सर्वस्व समर्पित करणारा नेता म्हणून जयवंत पाटील यांच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या कार्याला मुंबईच्या गिरणी कामगारांच्या लढ्याच्या आणि मुंबई मनपाच्या इतिहासाची नोंद घेताना विसरणे शक्य नाही. लोकविरोधी शक्ती आणि त्यांची लोकविरोधी धोरणे यांच्याविरोधी भूमिका घेणे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसार माध्यमांनी सोडून दिले आहे. काळाची गरज म्हणून लोकांचे प्रश्न हातात घेऊन जनतेचे लढे उभारण्यास कम्युनिस्टांनी कटिबद्ध होणे हाच खरा लाल सलाम जयवंत पाटील यांना अभिप्रेत ठरेल.
 
आगरी समाज हा नेहमीच लाल बावट्याखाली एकनिष्ठ आणि प्रत्येक संघर्ष लढ्यात अग्रेसर राहिला आहे, प्रभादेवीत झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबांना आधार देण्याचे काम जयवंत पाटील यांनी केले. प्रभादेवीकर त्यांचे ऋण विसरणे शक्य नाही असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ कृष्णा ब्रीद आणि आगरी सेवा संघाचे अध्यक्ष पद्माकर म्हात्रे यांनी व्यक्त केले. कॉ उदय चौधरी, कॉ एकनाथ माने, राष्ट्रवादीचे रमेश परब, सुभाष मराठे, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, कॉ विजय कोरे, कॉ डॉ. अनुराधा रेड्डी, कॉ पाटील यांच्या कन्या मिलन आणि रोशन यांनीही कॉ जयवंत पाटील यांच्या आठवणी आपल्या भाषणात जागविल्या. कॉ मधुकर कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विश्वनाथ घवाळी, कृष्णा पाटील, अनंत मोरे, चित्तरंजन कांबळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.