ठाणे : स्वातंत्र्याचा हिरक महोत्सव साजरा केला जात असतानाही मलंगगडानजीकच्या कोपर्याची वाडी या आदिवासी वस्तीला नागरी सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या निषेधार्थ येथील आदिवासींनी झोपडी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संदर्भात रिपाइं एकतावादीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या आदिवासींनी निवासी उपजिल्हाधिकारी ठोंबरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
अंबरनाथ तालुक्यातील हाजीमलंग ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या कोपर्याची वाडी येथे आदिवासीबहुल वस्ती आहे. येथील आदिवासी नागरी समस्यांनी त्रस्त आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षे झाली आहेत. मात्र, अद्यापही या वस्तीला नागरी सुविधा प्रशासनाकडून मिळालेल्या नाहीत. कोपर्याची वाडी हा आदिवासी पाडा इंग्रजी राजवटीच्या आधीपासूनच आहे. येथील आदिवासी बांधवांना नागरी सुविधांची पूर्तताच करण्यात आलेली नाही. सबंध अंबरनाथ तालुका नागरीकरणात आघाडीवर असला तरीही कोपर्याची वाडी येथे पायवाटा, नळपाणीपुरवठा योजना, दवाखाने आदी कोणत्याही व्यवस्था या ठिकाणी नाहीत. या गावात एक शाळा आहे.
मात्र, या शाळेपर्यंत पोहचण्यासाठी सुयोग्य रस्ता नसल्याने शिक्षकही गावात येत नाहीत. परिणामी, विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. एखादी व्यक्ती आजारी पडल्यास रुग्णवाहिका आदिवासी पाड्यात येऊ शकत नसल्याने रुग्णांना किंवाा गरोदर महिलेला डोली करुन गुडघाभर चिखलातून न्यावे लागत आहे. त्या प्रयत्नात अनेकांना आपली इहलोकीची यात्रा संपुष्टात आणावी लागत आहे. सन 2017 मध्ये या गावाला कल्याण-अंबरनाथशी जोडण्यासाठी पुलाचे बांधकाम करुन त्याचे लोकार्पण करण्यात आलेले आहे.
मात्र, या पुलाला जोडरस्ताच तयार करण्यात आलेला नसल्याने हा पूल म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा असा झाला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करुनही नागरी सुविधा मिळत नसल्याने या आदिवासींनी आज निवासी उपजिल्हाधिकार्यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 5 ऑक्टोबर रोजी झोपडी बांधो आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी शांताराम आगीवले, दशरथ आठवाल, गौरव गिरा आदी उपस्थित होते.