शहापूर: वासींद विभागात साने-पाली आसनगाव,कसारा खर्डी,शेई-शेरे,अंबर्जे,डोलखांब,किन्हवली,सारमाळ-दहागाव या वर्षी सतत पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ठाणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तयार झालेली भात शेती पाऊस वाऱ्यामुळे जमिनीवर पडली असून शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले आहे.
या वर्षी अरबी समुद्रात आलेल्या वादळामुळे लवकरच पाऊस आला होता.हा पाऊस पेरणीसाठी योग्य असल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाताची पेरणी केली.मान्सून येण्याच्या जवळ पास १५ दिवस आधी तालुक्यातील ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांनी या पावसात पेरणी केली होती त्यामुळे या वर्षी ९० ते १२० दिवसाचे भात पीक तयार झाले असून सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना भात पीक कापता येत नाही,भात पीकाचे दाणे भरलेले असल्याने पावसामुळे आणि हलक्या वाऱ्यामुळे भात पीक जमिनीवर पडले आहे.
शेतात साठणाऱ्या पाण्यामुळे भात पीक कुजून जाणाऱ्या किंवा रुजण्याचा धोका निर्माण झाला आहे.गेल्या दोन वर्षापासून तालुक्यात व जिल्ह्यातील शेतकरी ओल्या,कोरड्या दुष्काळामुळे बेजार झाला असून या वर्षी जर पाऊस असाच कायम राहील्यास या वर्षी देखील शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे