जिल्हा वार्षिक योजनेतून जनहिताच्या कामांना प्राधान्य द्या

जनदूत टिम    21-Sep-2021
Total Views |

  • जिल्ह्यात पुरेशा ऑक्सिजनसाठ्यासाठी नियोजन करावे
  • राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

ठाणे: लोकोपयोगी व जनहिताची कामे जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यासाठी प्राधान्य देतानाच शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार खर्च होईल याबाबत दक्षता घ्यावी. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याबरोबरच जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध होईल यासाठी नियोजन करावे, सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज येथे दिल्या.
 
thaner44_1  H x
 
येथील जिल्हाधिकारी कार्यालायतील नियोजन भवनाच्या सभागृहात कोकण महसूल विभागातील मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, या सहा जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांची आढावा बैठक श्री. क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी. बी. पाटील, सिंधुदूर्गचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, कोकण विभागाचे उपायुक्त (नियोजन) संजय पाटील, ठाणे जिल्ह्याचे नियोजन अधिकारी अमोल खंडारे व इतर जिल्ह्याचे जिल्हा नियोजन अधिकारी तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थितहोते.
 
श्री. क्षीरसागर म्हणाले, जिल्हा वार्षिक योजना व नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जनहिताच्या कामाला प्राध्यान्य देण्यात यावे. अनुसुचित जाती वस्ती सुधार योजनेचा निधी त्याच योजनेसाठी व त्याच कामासाठी खर्च करण्यात यावा. कोरोना कालावधीत कोकण विभागात कोरोना प्रतिबंधासाठी चांगले कार्य झाले असल्याचे सांगून श्री. क्षीरसागर म्हणाले, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, महसूल आणि पोलीस विभाग, स्वयंसेवी संस्था, विविध शासकीय विभाग आणि पत्रकारांनी कोरोना लढ्यात चांगली कामगिरी केली. कोरोना रुग्णांना उपचारासाठी वाढीव बील आकारणी झाले असेल त्या ठिकाणी पुन्हा लेखा परिक्षण करण्यात यावे. तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत त्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
 
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे कार्य व विचाराच्या प्रचार प्रसारासाठी विविध उपक्रम घेण्यात यावेत. तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात स्मारक उद्यान उभे करून यामध्ये जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची उभारणी, ओपन जीम, कलादालन आदी विकासकामे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करावी, असेही श्री. क्षीरसागर सांगितले.
यावेळी सन 2018 ते सन 2020-21 या वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण योजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच 2020-21 व सन 2021-22 या आर्थिक वर्षात शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेमधून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत झालेल्या कामांचा आणि खर्चाचा जिल्हानिहाय व यंत्रणानिहाय आढावा घेतला. प्रास्ताविक उपायुक्त श्री. पाटील यांनी केले. ठाणे जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी आभार मानले.