पाली/गोमाशी: जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी उमेश जाधव यांनी आपल्या गावी सुधागड तालुक्यातील कासारवाडी येथे गणेशोत्सवात अनोख्या पद्धतीने पर्यावरण विषयक जनजागृती केली आहे. पर्यावरण जागृतीचे विविध संदेश कागदी पिंपळाच्या पानावर दिले आहेत. विशेष म्हणजे निसर्गाची कत्तल व डोंगराला आत्महत्या करण्यापासून थांबवा सद्य परिस्थितीवर अशा प्रकारे बाप्पाची मूर्ती बोलत आहे असे रेकॉर्डिंग लावले आहे. या अनोख्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा आहे.
मूर्तीपाठी गणरायाचे आज्ञापत्र लावले आहे. हे आज्ञापत्र गणराय स्वतः सांगत आहे अशी रेकॉर्डिंग आहे. त्यामध्ये निसर्गाचा समतोल बिघडला की डोंगर सुद्धा आत्महत्या करतो. म्हणजेच दरडी कोसळतात. पूर, साथीचे रोग हे मानवाच्या निसर्गातील अवाजवी हस्तक्षेपामुळे घडत आहे. निसर्ग टिकला तरच तुम्ही टिकाल असे बाप्पा भेटायला येणाऱ्या भक्तांना सांगत आहे.
निसर्गाच्या होणाऱ्या अनन्वित कत्तलीला आळा बसावा, कारण निसर्ग टिकला तर माणूस जगेल या भावनेतून हा उपक्रम केला आहे. त्या प्रकारचे संदेश बनवले आहेत. बाप्पा भक्तांना काय सांगतोय हे रेकॉर्डिंग च्या माध्यमातून सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. असे कवी उमेश जाधव यांनी सांगितले.