मुंबईच्या पावसाने घेतला २२ जणांचा बळी

जनदूत टिम    18-Jul-2021
Total Views |

  • चेंबूर आणि विक्रोळीमध्ये मोठ्या दुर्घटना

मुंबई : मुंबईतल्या पावसामुळे एकूण २२ जणांचा मृत्यू झाला आहे. चेंबूर परिसरात १७ आणि विक्रोळीत ५ जणांचा जीव गेला आहे. अधिक माहितीनुसार, चेंबूर अपघातात १६ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं असून इथं पाच घरं कोसळली असल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. तर एनडीआरएफची टीम अजूनही सर्च ऑपरेशन करत असल्याची माहिती आहे.
 
chembur55_1  H
 
चेंबूरमध्ये भागात घरांची भिंत कोसळल्याने यामध्ये तब्बल १७ जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जखमींना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. डीसीपी प्रशांत कदम यांनी सांगितले की, विक्रोळीतील कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातून ५ मृतदेह सापडले आहेत. यामध्ये आणखी ५-६ लोक अडकल्याची भीती आहे.
 
चेंबूरच्या या भागात अरुंद गल्ली असून यामुळे बचाव करणे कठीण झाले आहे. इतकंच नाहीतर ही जागा काही उंचीवरदेखील आहे. यामुळे एनडीआरएफ टीमला तिथे पोहोचणे अवघड झाले आहे. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. स्थानिक लोकांचीही मदत यात घेण्यात येत आहे. शनिवारी रात्री साडे बारा वाजता हा अपघात झाला, अशी एका प्रत्यक्षदर्शीने माहिती दिली आहे. यामध्ये काही लहान मुलंही ढिगाऱ्याखाली अडकली आहेत.
 
चेंबूर, कांदिवली आणि बोरिवली पूर्व इथं पूरसदृश परिस्थिती
गुरुवारी रात्रीपासून मुंबईत पाऊस सुरू आहे. चेंबूर, कांदिवली आणि बोरिवली पूर्व इथे पूरसदृश परिस्थिती आहे. हवामान विभागाने, पावसासंदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारी सकाळपासूनच बऱ्याच भागात पाऊस पडत आहे. दिवसभर येथे मध्यम ते मुसळधार पाऊस संभव आहे.
 
मुंबईसह आसपासच्या शहरातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. फोर्ट परिसर, कल्याण, भांडूप या परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. ठाणे आणि रायगडमध्येही मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात ढगांनी मोठी दाटी केली आहे. मध्य मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
 
दरम्यान, हवामान खात्याने रविवारीही मुंबई व आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात २५३.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या १२ वर्षात तिसऱ्यांदा जुलै महिन्यात एकाच दिवसात इतका पाऊस झाला आहे. आयएमडीच्या आकडेवारीनुसार, याआधीही मुंबईत १५ जुलै २००९ रोजी २७४.१ मिमी पाऊस पडला होता तर २ जुलै २०१९ रोजी ३७६.२ मिमी पाऊस पडला. यामुळे लोकांना समुद्रापासून दूर रहाण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.