अंधश्रद्धा हा एक धर्ममान्य आणि लोकमान्य धंदा बनला असून ते बुद्धी चुकार लोकांचे विश्रामगृह आहे- डॉ. यशवंत मनोहर

जनदूत टिम    12-Jul-2021
Total Views |
ठाणे : राजकारणात पुष्कळ अंधश्रध्दा असून राजकारणी जाणीवपूर्वक अंधश्रद्धांचा पसार करतात. त्यात त्यांचे हित आहे. अंधश्रद्धा हा एक धर्ममान्य आणि लोकमान्य धंदा बनला असून ते बुद्धी चुकार लोकांचे विश्रामगृह आहे. असे प्रतिप्रादन अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका मासिकाच्या ऑनलाईन प्रकाशनाच्या वेळी जेष्ठ साहित्यिक, विचासवंत डॉ.यशवंत मनोहर यांनी केले.
 
pic_1  H x W: 0
 
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नव्याने सुरू केलेल्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’ या ई-मासिकाचे ऑनलाईन प्रकाशन डॉ. यशवंत मनोहर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, मासिकाचे संपादक डॉ. नितीन शिंदे, कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड, डॉ. दीपक बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त केले.
 
उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. यशवंत मनोहर पुढे म्हणाले की, ‘माणूस भयग्रस्ततेने परावलंबी होऊन बुद्धिपासून दूर जातो. मात्र विचार करणारी बुद्धी ही मानवी अस्तित्वाचे सत्व आहे. ते सत्व गमावले की माणूस म्हणून जगण्यासारखे व्यक्तीकडे काही रहात नाही. मानसिकदृष्ट्या रुग्ण असलेला समाज जगण्याला पारखा झालेला असतो. अशा समाजाला स्वास्थ्येपूर्ण जगता येत नाही.
 
त्यामुळे समाजाच्या चांगल्या आरोग्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम आणि त्यांच्या मासिकातील चर्चाविश्व समजून घेतले पाहिजे. महाराष्ट्र अंनिसचे काम हे देशाच्या मानसिक आरोग्यासाठीचे अभियान आहे, असे डॉ. यशवंत मनोहर म्हणाले.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात काहीही फरक करता येत नाही. तर्काला मूठमाती दिल्यावर श्रद्धा जन्माला येते आणि तर्काची हत्या केल्यावर अंधश्रद्धा जन्माला येते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा तर्क, विज्ञान, बुद्धीप्रामाण्याला मानत नाहीत. त्यामुळे हे दोन्हीही एकच आहे, असे मत डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केले.
 
या आॕनलाईन प्रकाशन कार्यक्रमाचे सोशल मिडिया प्रसिद्धीचे काम राज्य पदाधिकारी अवधूत कांबळे, राज्य सरचिटणीस नितीन राऊत यांनी पाहिले. या कार्यक्रमात सहभागीनी उदंड प्रतिसाद दिला.