जिल्ह्याचा आरोग्य आराखडा तयार करण्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांचे निर्देश

जनदूत टिम    21-May-2021
Total Views |
पालघर : “म्युकरमायकोसीस” तसेच लहान मुलांना होणारे आजार आणि कोव्हिड प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याचा आरोग्य आराखडा तयार करण्याचे निर्देश कृषी, माजी सैनिक कल्याणमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी आरोग्य विभागाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी दादाजी भूसे बोलत होते.
तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील नऊशे (900) गावांचा विजपुरवठा खंडीत झाला होता. यापैकी आठशे (800) गावांचा विजपुरवठा पुर्ववत करण्यात आला. जवळपास 941 कर्मचारी व अधिकारी यांनी कमी वेळेत सदर गावाचा विजपुरवठा पुर्ववत करण्यासाठी परिश्रम घेतले.

bhuse55_1  H x
 
तोक्ते चक्रीवादळाच्या कालावधीत कोव्हिड रुग्णांना ऑक्सीजनची कमतरता भासू नये यासाठी ऑक्सीजनचा पुरेसा साठा करण्यात आला होता. चक्रीवादळामुळे, शेती तसेच फळपिकांचे त्याचबरोबर मच्छीमार, वीटभट्टी कुक्कटपालन आदिचे नुकसान झाले आहे. शासनाच्या निकषानुसार त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.
जिल्ह्यासाठी सुसज्य आणि अद्ययावत सामान्य रुग्णालय निर्माण करण्यासाठी आरोग्य विभागाला सुचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील जव्हार, डहाणू आणि पालघर येथे ऑक्सीजन निर्मिती करण्यासाठीचा प्रकल्प येत्या महिन्याभरात पुर्णत्वास येईल असेही पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.
उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पालघर जिल्ह्यातील खंडीत झालेल्या विज पुरवठ्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी, खासदार राजेंद्र गावित, सर्वश्री आमदार श्रीनिवास वनगा, सुनिल भुसारा, राजेश पाटील, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यावस्थापकीय संचालक विजय सिंघल, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दाराम साळीमठ, पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन आदि अधिकारी आढावा बैठकीस उपस्थित होते.