2070 पर्यंत भारतातील कार्बन उत्सर्जन शून्यावर आणले जाईल’- पंतप्रधान मोदी

जनदूत टिम    02-Nov-2021
Total Views |
ग्लासगो : हवामानबदलासारख्या गंभीर समस्येवर चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी COP26 परिषदेत जगासमोर भारताची भूमिका मांडली. यावेळी बोलताना सन 2070 पर्यंत भारतातील कार्बनचे उत्सर्जन शून्यावर आणले जाईल असे सांगितले. हवामान बदलाविषयी त्यांनी भारताचे विचार जगाला सांगितले.
 
mod_1  H x W: 0
 
ब्रिटनमध्ये ग्लोसगो शहरात हवामानबदलांवर चर्चा करण्यासाठी COP26 परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 31 ऑक्टोबरपासून 12 नोव्हेंबरपर्यंत ही परिषद चालणार असून पंतप्रधान मोदी यांनी सभेला संबोधित केले. यावेळी अनेक देशांचे प्रमुख नेते या बैठकीस उपस्थित आहेत.
 
पंतप्रधान मोदी यांनी कार्बंन उत्सर्जन कमी करण्याचे आश्वासन दिले. तसेच भारत आज रिन्यूएबल एनर्जी निर्मितीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. जगातील पूर्ण लोकसंख्येच्या अर्धे लोक भारतात वर्षभरात फक्त रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वेने 2030 पर्यंत उत्सर्जनाच्या बाबतीत नेट झिरोवर येण्याचे लक्ष्य समोर ठेले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
 
सोबतच भारत 2030 पर्यंत गैर-जीवाश्म ऊर्जेच्या क्षमतेला 500 गीगावॅटपर्यंत पोहोचवेल. तसेच 2030 पर्यंत भारत उर्जासंबंधीच्या 50 टक्के गरजा अक्षय ऊर्जेतून पूर्ण करेल असे मोदी म्हणाले. 2030 पर्यंत भारत एकूण अंदाजित कार्बन उत्सर्जन एक अब्ज टनांनी कमी करेल. तसेच भारत 2070 पर्यंत नेट झिरोचे लक्ष्य प्राप्त करेल, असेही मोदी यांनी सांगितले.