ठाणे : राज्य निवडणूक आयोगाने एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालाधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुक १५ जानेवारी २०२१ रोजी ७.३० ते ५.३० या वेळेत होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक होणार आहे त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी शुक्रवार १५ जानेवारी रोजी भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे. आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना व माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, रिटेलर्स इत्यादी येथील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, विविध आस्थापना यांना भरपगारी सुट्टी देणे शक्य नसल्यास दोन तासाची सवलत देण्यात यावी. याबाबत योग्य ती दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक आहे. याप्रकरणी संबंधित मतदार मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहिल्यास संबंधितांविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.