मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली, अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी खंत व्यक्त केली. पहाटेच्या शपथविधीच्या आठवणी अद्यापही भाजप नेत्यांच्या मनात ताज्या दिसत आहेत.
“शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे विधानपरिषदेच्या उपसभापती पदी आल्या आणि आमचं सरकार आलं, म्हणून त्यांना पुन्हा या पदावर नियुक्त केलं” असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान सभेत सांगितलं. त्यावर बोलताना “अजितदादांचा पायगुण काय होता हे महाराष्ट्राने पाहिलं. आमच्यासोबत अजितदादा आले सत्तेचं काय झालं?” असा टोला दरेकर यांनी लगावला.
अजित पवारांच्या पायगुणाचा उल्लेख करत असताना, “त्यांच्या पायगुणाने आमची सत्ता गेली” ही खंत प्रवीण दरेकर यांनी बोलून दाखवली. विधानपरिषद उपसभापती निवडीवर आमचा आक्षेप कायम आहे, अशी भूमिका प्रवीण दरेकर यांनी यावेळी मांडली. सरकारची भूमिका हट्टाची आहे. गुरुवारी न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे, असे असतानाही ही निवडणूक घेण्यात आली, असे दरेकर म्हणाले.