मुंबईत आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाचं स्वप्न असतं. म्हाडाच्या माध्यमातून आपलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक कुटुंब आपलं नशीब आजमवून पाहत असतात. अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होतं, तर अनेकांच्या पदरी निराशा येते. दरम्यान आता म्हाडाकडून मुंबई आणि ठाण्यात परवडणारी घरं उभारली जाणार असल्याची घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, “म्हाडा स्थापन करण्यामागे मुंबई आणु मुंबई उपनरांमध्ये गोरगरिबांना परवडणारी घरं मिळाली पाहिजेत असा उद्धेश होता. म्हाडाच्या मार्फत कन्न्मवार नगर, ज्ञानेश्वर नगर, अभुदय नगर, आदर्श नगर असे अनेक प्रकल्प उभे राहिले. यांच्या मार्फत लोकांना परवडणारी घरं मिळाली. पण १९८० च्या दशकानंतर एकही असं नगर बनू शकलेलं नाही”.
“मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन परवानगी घेणार आहे. ते परवानगी देतील असा मला विश्वास आहे. काही जमिनी वादात असून कोर्टात अडकून आहेत. त्या जमिनी म्हाडा विकत घेऊ शकतं. बिल्डर जिथे आठ हजाराला घऱ विकतो तिथे म्हाडा साडे चार, पाच हजारांमध्ये ते घर विकू शकतं. पवईत एका घराच्या मागे दीडशे अर्ज येतात आणि खासगी बिल्डरला एक घर विकताना मारामारी करावी लागते. लोकांचा म्हाडावर विश्वास आहे. लोकांना परवडणारी घरं देऊ शकलो तर म्हाडाचा मूळ उद्देश सार्थकी लागेल,” अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. .