रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी खासगी वाहनाने गावी येणाऱ्यांसाठी इ-पास सक्तीचा आहे. कशेडी चेकपोस्टवर इ-पासची तपासणी केली जाईल. बोगस पास घेऊन येणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. खासगी बसचालकांना एस.टी.च्या दरापेक्षा दीडपट दर आकारता येईल त्यापेक्षा कुणी जास्त दर आकारला तर त्यांच्यावर उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलिस कारवाई करतील असा इशारा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत सांगितले.
एस.टी.बस वगळता अन्य वाहनांची कशेडीत तपासणी केली जाईल. ५५ वर्षावरील जे प्रवासी आहेत त्यांची अॅंटीजेन तपासणी केली जाईल. चाकरमान्यांसाठी दहा दिवसांचा क्वॉरंटाईन काळ असून ग्राम कृतीदलाने गणेशोत्सवात आरतीला किती माणसे असतील. आगमन आणि विसर्जन मिरवणूकीला किती माणसे असतील याची नियमावली तयार केली आहे. त्याचे पालन केले जाईल असे सामंत यांनी सांगितले. जिल्ह्यात डॉक्टरांची कमतरता आहे त्यावर सामंत म्हणाले की, मी उद्या जिल्ह्यातील सर्व खासगी डॉक्टरांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स घेणार आहे.