- आदिवासींच्या समृद्धीसाठी नंदूरबारपासून ते पालघर, रायगडपर्यंत ६० ते ७० रानभाज्या
मुंबई : आदिवासी भागात आढळणाऱ्या रानभाज्यांचे मार्केटिंग करण्याचा निर्णय राज्याच्या कृषी विभागाने घेतला आहे. यासाठी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रानभाज्या महोत्सव भरवला जाणार आहे. मंत्रालयात या महोत्सवाचे उद्घाटन झालं. राज्याच गडचिरोली, नंदूरबारपासून ते पालघर, रायगडपर्यंत ६० ते ७० रानभाज्या आढळतात. आरोग्यासाठीही या रानभाज्या महत्त्वाच्या आहेत.
यातून आदिवासींना उत्पन्न मिळावं म्हणून या रानभाज्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. रानभाज्या महोत्सव प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आल्याचे भुसे यांनी सांगितले. या रानभाज्या नागरिकांना कायमस्वरूपी कशा उपलब्ध होतील यांचेही नियोजन करण्यात येणार आहे.
शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून हा रानभाज्यांचा औषधी ठेवा शहरातील नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे कृषीमंत्री म्हणाले.