विजेचा शॉक लागून मृत झालेल्या म्हशींच्या मालकास त्वरीत नुकसान-भरपाई द्यावी

जनदूत टिम    29-Jul-2020
Total Views |

- वसई विरार जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष कुलदीप वर्तक यांची महावितरणाकडे मागणी

वसई : नायगांव पूर्व बापाणे येथील एक दुग्ध व्यावसायिक प्रशांत म्हात्रे यांच्या ४ दुभत्या म्हशी घराजवळील रामदेव ब्लॉक कंपनीच्या जवळपास शेतात चरण्यासाठी गेल्या असता शेतामध्ये महावितरण कंपनीच्या वीजप्रवाहीत तारा तुटून पडलेल्या होत्या. त्या जिवंत तारांच्या संपर्कात आल्याने चारही म्हशींना जोरदार धक्का बसून त्या जागीच मृत झाल्या.
 
shock_1  H x W:
 
दुभत्या म्हशींपासून मिळणार्‍या उत्पन्नावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असून म्हशी गतप्राण झाल्यामुळे प्रशांत म्हात्रे यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. गेल्या आठवड्यात घडलेल्या या दुर्घटनेचे वृत्त समजल्यानंतर वसई विरार जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी सदर अपघाताची माहिती मिळवून विद्युत निरीक्षकांमार्फत म्हशींच्या मृत्यूच्या घटनेचा पंचनामा करुन मालकांना त्वरीत नुकसान-भरपाई द्यावी तसेच तात्काळ मदतीच्या स्वरुपात जी काही आगावू रक्कम असेल ती ताबडतोब द्यावी अशा आशयाचे पत्र मा. उर्जामंत्री मा.ना. नितीन राऊत आणि महावितरण कंपनीचे वसई विभागाचे अधिक्षक अभियंता मंदार अत्रे यांना दि. २५-०७-२०२० रोजी दिले असून नुकसान-भरपाई त्वरीत देण्याची मागणी युवक काँग्रेसचे कुलदीप वर्तक यांनी केली आहे.