जव्हार : केळीचा पाडा (काळशेती) येथील धबधब्यावर फिरायला गेलेली पाच तरुण मुलं पाण्यात बुडाल्याचे वृत्त आहे. हे पाचही जण जव्हार येथील अंबिका चौक भागातील रहिवासी आहेत.
दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून या घटनेमुळे जव्हार शहरात हळहळ व्यक्त होत आहे. जव्हार शहरात टाळेबंदी असल्यामुळे बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. जव्हार शहरातील अंबिका चौक येथील १३ मुले काळमांडवी धबधब्यावर दुपारी पोहण्यासाठी गेली होती. हा धबधबा खूप मोठा व खोल दरीत असून येथे पावसाळ्यात खाली उतरण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यात तीन मोठे पाण्याचे डोह आहेत. त्यामुळे या मुलांना खोलीचा अंदाज न आल्याने या डोहात एकाच वेळी पाच मुले बुडाले. बुडालेल्या पाचही जणांचा अद्याप पत्ता लागलेला नाही. दरम्यान, त्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार सुनील भुसारा यांनी दिली. याबाबत जव्हारचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे हे सघटनास्थळी पोहचले असून तपास करण्यात
आला आहे.