मंत्रालयासमोरील मंत्र्यांचे बंगले करोनाच्या विळख्यात?

जनदूत टिम    04-Jun-2020
Total Views |
मुंबईला करोनाने विळखा घातला असतांना दक्षिण मुंबईतील नरिमन पॉईंट, मलबार हिल हा परिसर तसा सुरक्षित समजला जात होता. परंतु, गेल्या काही दिवसात मंत्रालयासमोरील मंत्रांच्या बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या कर्मचारी निवासस्थानात राहणाऱ्या काही लोकांना करोनाची लागण झाल्याचे आणि हा परिसर विलगीकरण करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्यातील सूत्रांनी दिली.
 
mantralaya-new_1 &nb
 
या निवासस्थानात रहिवास करणारे कर्मचारी हे खासकरून विविध मंत्रांच्या बंगल्यात खानसामा, आचारी, कपडे इस्त्री करणारे आहेत. करोना लागण झालेल्या या कर्मचाऱ्यांनी कुठल्या मंत्री बंगल्यात या काळात काम केले आहे, याची खातरजमा होत नसल्याने मंत्री बंगले निर्जंतुकीकरण करणे आवश्यक झाले आहे. अशा परिस्थितीत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आताच झाले तर ती मंत्री, त्यांचे कर्मचारी आणि अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
 
सार्वजनिक बांधकाम विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे कर्मचारी निवासस्थान विलगिकरण करण्यात आले आहे. या निवासस्थानात मंत्री बंगल्यावर घरगुती काम करणारे कर्मचारी वर्षानुवर्षे राहत आहेत. यातील बहुसंख्य कर्मचारी हे संबंधित मंत्र्यांनी गावाकडून मदतनीस म्हणून आणलेले आहेत. ते कुठल्याही शासकीय सेवेत नाहीत. मंत्री बदलला आणि नवीन आला की हे त्या मंत्र्यांकडे स्वतःची शिफारस करून काम मिळवतात आणि याच वसाहतीत राहतात.
 
गेल्या काही दिवसात “यशोधन” या सनदी अधिकाऱ्यांच्या इमारतीत करोनाने शिरकाव केला. आता, या कर्मचारी वसाहतीत देखील करोना शिरकाव झाला आहे. मंत्री बंगले आणि विधनभवनच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील मोकळ्या पटांगणाला लागून असलेल्या या वसाहतीतील करोना रुग्णाचा धोका या अत्यंत व्हीआयपी परिसराला होऊ शकतो आणि त्याचा प्रसार वाढू शकतो, अशी भीती बांधकाम विभागातील या अधिकऱ्याने व्यक्त केली. दरम्यान, या कर्मचाऱ्यांनी कुठल्या मंत्री बंगल्यात काम केले होते, याची माहिती घेतली जात आहे. शासनातील एक घटक येत्या २२ जूनपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन भरवण्यासाठी आग्रही आहे. कमी कालावधीसाठी झाले तरी चालेल पण अधिवेशन भरवावे, असा अग्रग धरला जात आहे.
 
या आग्रही मागणीमुळे विधानभवन कर्मचारी धास्तावले आहेत. “मुळात मंत्री बंगले सुरक्षित नाहीत. ते निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. अधिवेशनासाठी २८८ आमदार आणि त्यांचे खाजगी स्वीय सहायक येणार. मंत्र्यांसोबत त्यांचा कर्मचारी वर्ग, आमदारांनी उपस्थित केलेल्या संबंधित विषयांकित तारांकित प्रश्न, लक्षवेधी यांच्याशी संबंधीत अधिकारी अधिवेशनाला सभागृहात उपस्थित राहणार. हे अधिवेशन पार पाडण्यासाठी लागणारा विधिमंडळाचा सर्व अत्यावश्यक कर्मचारी वर्ग, कँटीन आणि अशा सर्व माध्यमातून किमान काही हजार व्यक्ती रोज विधानभवनात हजेरी लावणार. यात कोणाला करोना झाला आहे, हे समजणे कठीण. अशा वेळी, एखाद्या करोना रुग्णापासून असंख्य महत्वाचे राजकीय आणि शासकीय व्यक्ती करोना बाधित झाले तर कठीण समस्या उभी राहील”, अशी भीती विधिमंडळाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली.
 
काँग्रेसच्या एका माजी आमदाराने मत व्यक्त केले की, करोना संकट असल्याने संसदेचे अधिवेशन जसे एक महिना पुढे ढकलले, तसा निर्णय महाराष्ट्र विधिमंडळाने आणि राज्य सरकारने घ्यावा. “दोन अधिवेशनात सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी असू नये असे घटनेत नमूद केले आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १४ मार्च रोजी संपविण्यात आले. याचा अर्थ पुढचे पावसाळी अधिवेशन सप्टेंबरपर्यंत कधीही घेता येऊ शकेल. मुंबई हे करोनाचे हॉटस्पॉट झालेले असतांना राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्व आमदारांना मुंबईत बोलावून त्यांच्या आरोग्याशी खेळ खेळणे राज्याला परवडणारे नाही,” असे परखड मत या माजी आमदाराने व्यक्त केले. ते म्हणाले, केवळ आमदार नव्हे तर मंत्री आणि राज्यातील असंख्य वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांना संकटात ढकलणे असाच हा विचार आहे. असे कोण अधिकारी आहेत, जे जुनमध्येच अधिवेशन घेण्यासाठी आग्रही आहेत, त्यांचा शासनाने शोध घ्यावा, अशीही मागणी त्यांनी केली. ते म्हणाले, “राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांची भेट घेऊन त्यांना ही समस्या समजावून सांगितली तर ते नक्कीच अधिवेशन पुढे ढकलतील आणि दुसरी तारीख जाहीर करतील, असा विश्वास नुकतेच निवृत्त झालेल्या या माजी आमदारांनी व्यक्त केला.