संपूर्ण ठाण्यात २७७, पण मुंब्र्यात एका दफनभूमीतच १४२ कोरोना बळी कसे : किरीट सोमय्या

जनदूत टिम    26-Jun-2020
Total Views |
मुंब्र्यातील चारपैकी दोन दफनभूमी क्षमता संपल्याने बंद : निरंजन डावखरे
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत २७७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मुंब्रा येथील एका दफनभूमीतच कोरोना व कोरोना संशयित १४२ नागरिकांचा मृत्यू झाल्याची कागदोपत्री नोंद आहे. त्यावरून मुंबईप्रमाणेच ठाण्यातही मृतांची संख्या दडपण्यात येत आहे. ठाण्यात ८०० नागरिकांचा कोरोनाने मृत्यु झाल्याची शंका असून, त्यातील ४०० मुंब्र्यातील आहेत, असा आरोप भाजपाचे ठाणे प्रभारी व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. तर मुंब्र्यातील ४ पैकी दोन दफनभूमी क्षमता संपल्यामुळे बंद केल्या.
 
KIRITSOMAIYABJP_1 &n
 
उर्वरित दोन्ही दफनभूमी महिनाभरात बंद पडतील, याकडे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले. कोरोनामुळे ठाणे शहरातील परिस्थिती गंभीर होत असल्याबरोबरच विविध उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांनी मंगळवारी तत्कालीन आयुक्त विजय सिंघल यांची भेट घेतली होती. त्यावेळी ठाणे महापालिकेकडून मृतांची संख्या लपविली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपाबाबत महापालिका प्रशासनाला खात्री देण्यासाठी श्री. सोमय्या, निरंजन डावखरे, महापालिकेतील भाजपा गटनेते संजय वाघुले यांनी आज मुंब्र्याचा दौरा केला. तेथील चारही दफनभूमीतील नोंदीनुसार माहिती घेतली. त्यावेळी एम एम व्हॅलीनजीकच्या एका स्मशानभूमीत कोरोना व कोरोना संशयित म्हणून तब्बल १४२ नागरिकांचे दफनविधी झाले असल्याचे तेथील रखवालदाराने व कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. २२ मार्चपासून दररोज १४ ते १५ मृतदेह येत होते. त्यामुळे मुंब्रा-कौसा भागात कोरोनामुळे तब्बल ४०० जणांचे मृत्यू झाल्याचा संशय आहे. तर ठाणे शहरात ही संख्या ८०० पर्यंत आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला.
 
मुंब्रा दफनभूमीत मार्चमध्ये ७४, एप्रिलमध्ये १६० आणि २३ जूनपर्यंत १७३ नागरिकांचे मृत्यू झाले. कौसा दफनभूमीत मार्चमध्ये ६३, एप्रिलमध्ये ८२, मेमध्ये २४० आणि २३ मेपर्यंत २०७ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत २७७ मृत्यू झाल्याचे राज्य सरकारने जाहीर केले. मात्र, मुंब्रा-कौसा भागातच १ एप्रिल ते २३ जूनपर्यंत ९५३ नागरिकांचे दफनविधी पार पडले आहेत. कोरोनामुळेच मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे, याकडे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे किरीट सोमय्या यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. दरम्यान, या दौऱ्यात दफनभूमीतील कर्मचारी पीपीई किटविना कार्य करीतअसल्याचे आढळले. त्यावेळी त्यांना भाजपाच्या वतीने पीपीई किट देण्यात आले.
 
दफनभूमीची क्षमता संपूनही मुंब्र्यातील मंत्री गप्प : निरंजन डावखरे
कोरोनाच्या संसर्गाने वाढत्या मृत्युमुळे मुंब्रा-कौसा येथील चार दफनभूमीपैंकी दोनची क्षमता संपली आहे. आणखी महिनाभरात दोन दफनभूमींमध्ये जागा राहणार नाही.
 
niranjandavkahre_small_1&
 
त्यानंतर दफनविधी कुठे करायचे हा प्रश्न आहे. मात्र, या विषयावर मुंब्रावासियांचे प्रतिनिधीत्व करणारे मंत्रीमहोदय गप्प का आहेत, असा सवाल आमदार निरंजन डावखरे यांनी केली. या प्रश्नावर राज्य सरकार व महापालिकेवर दबाव आणण्याची आवश्यकता आहे. मुंब्रावासियांसाठी तत्काळ दफनविधीसाठी मोठी जागा राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी डावखरे यांनी केली.