भारतात विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानला हवंय लिखीत आश्वासन

जनदूत टिम    25-Jun-2020
Total Views |
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील तणावाच्या राजकीय संबंधांचा फटका आतापर्यंत क्रीडा स्पर्धांना बसला आहे. आयसीसीच्या स्पर्धांचा अपवाद वगळता भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ एकमेकांशी क्रिकेट मालिका खेळत नाहीत.
 
pakistan-cricket-team-cor
 
याव्यतिरीक्त अन्य महत्वाच्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना भारताचा व्हिसा मिळवण्यासाठी याआधी अनेकदा त्रास सहन करावा लागला आहे. सध्या करोनामुळे बहुतांश क्रीडा स्पर्धा बंद असल्या तरीही, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याआधीच्या अनुभवांमधून शहाणं व्हायचं ठरवलं. २०२१ टी-२० विश्वचषक आणि २०२३ वन-डे विश्वचषक या दोन महत्वाच्या स्पर्धांची यजमानपदं भारताला मिळाली आहेत. या स्पर्धेत पाकिस्तानी संघाला सहभागी होण्यासाठी कोणताही व्हिसा प्रॉब्लेम येणार नाही, असं लिखीत आश्वासन देण्याची मागणी पाक क्रिकेट बोर्डाने केली आहे.“२०२१ आणि २०२३ मध्ये होणाऱ्या महत्वाच्या स्पर्धांचं यजमानपद भारताकडे आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानी संघाला कोणत्याही समस्येला सामोरं जावं लागणार नाही यासाठी आम्हाला लिखीत आश्वासन हवं आहे.
 
बीसीसीआयने आम्हाला हमी द्यावी अशी मागणी आम्ही आयसीसीकडेही करणार आहोत. विश्वचषक खेळण्यासाठी येणाऱ्या पाकिस्तानी संघाला व्हिसा क्लिअर झालाच पाहिजे.” पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ वासिम खान यांनी एका यू-ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत PCB ची बाजू मांडली. २०२० सालात ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०२१ च्या विश्वचषकाचं यजमानपद कोणाकडे द्यायचं याबद्दल आयसीसीने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. पाकिस्तानीकडून भारतावर होणारे दहशतवादी हल्ले याचं कारण देत भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.