राज्यात मे महिन्यात ३३ लाख ८४ हजार ४० शिवभोजन थाळ्यांचे वाटप - छगन भुजबळ

जनदूत टिम    01-Jun-2020
Total Views |
मुंबई : राज्यातील ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. मे महिन्यात राज्यातील १ कोटी ५२ लाख ५२ हजार ४ शिधापत्रिकाधारकांना ७४ लाख ८४ हजार १० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तसेच ३३ लाख ८४ हजार ४० शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
 
chagan_bhujbal_1 &nb
 
राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून मे मध्ये सुमारे २० लाख ६८ हजार ५९६ क्विंटल गहू, १५ लाख ८८ हजार ९७२ क्विंटल तांदूळ, तर २२ हजार १० क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ४ लाख ४३ हजार ६२४ शिधापत्रिकाधारकांनी माहे मे मध्ये ते जेथे राहत आहे, त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.
 
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. १ ते ३१ मे पर्यंत या योजनेतून १ कोटी ३४ लाख ६९ हजार २२ रेशनकार्डवर मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील ६ कोटी ६ लाख ७० हजार ५१२ लोकसंख्येला ३० लाख ३३ हजार ५३० क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे.
राज्य शासनाने COVID 19 संकटावरील उपाययोजनेसाठी ३ कोटी ०८ लाख ४४ हजार ०७६ एपीएल केसरी लाभार्थ्यांना मे व जून २०२० या २ महिन्यासाठी प्रती व्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतून मे मध्ये ७ लाख ९२ हजार ९१० क्विंटल धान्याचे वाटप केले आहे.
 
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत एप्रिल ते जुन दरम्यान प्रती रेशनकार्ड १ किलो मोफत तूर किंवा चणा डाळ देण्याची तरतूद आहे. या योजनेतून सुमारे ८४ हजार १८८ क्विंटल डाळीचे वाटप केले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो मोफत तांदूळ वितरण करण्यात येत आहे. राज्यात मे महिन्यात ८३८ शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे ३३ लाख ८४ हजार ४० शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.