मुंबई: लोककलावंत छगन चौगुले यांचे निधन झाले. सेव्हन हिल्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'कथा चांगुणाची', 'कथा श्रावण बाळाची', 'आईचे काळीज', 'अंबाबाई कथा : कथा तुळजापुरची भवानी', 'कथा देवतारी बाळूमामा' यांच्या ध्वनीमुद्रीका आजही लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. पण 'खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली' या गाण्याने त्यांना विशेष ओळख मिळवून दिली. आजही अनेक कार्यक्रमांमध्ये छगन चौगुले यांचं हे गाणं आवर्जुन वाजवलं जातं.
मुळात जागरण गोंधळी असलेल्या छगन यांनी लोककलेचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते. मात्र त्यांच्यातील अंगभूत गुणांमुळे ते लोककलावंत म्हणून प्रसिद्ध झाले. कला सादर करण्याची त्यांची पद्धत ही इतरांहून वेगळी होती. छगन चौगुले यांनी कुलदेवतांची गाणी आणि लोकगीतं विशेष गायली.