विद्यापीठ, महाविद्यालय अन् सीईटी परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर होणार

जनदूत टिम    06-Apr-2020
Total Views |
मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये परीक्षे संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. आज सकाळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

SSC_1  H x W: 0 
 
विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटीसेलकडून पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा रद्द होणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, या सर्व परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर केले जाणार असल्याचे या बैठकीत ठरले आहे. या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, एसएनडीटी विद्यापीठाचे कुलगुरु शशिकला वंजारी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून महाविद्यालयीन परीक्षेचे वेळापत्रक नियोजन, शैक्षणिक वर्षाचे नियोजन असा अहवाल तयार करून विभागाचे सचिव आणि मंत्री यांना सादर करतील त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल.
 
विद्यापीठात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मल्टीपर्पज लॅब
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आकृषी विद्यापीठांमध्ये विविध प्रकारच्या आजारा संदर्भातील चाचण्या घेता येतील अशा स्वरूपाच्या मल्टिपर्पज लॅब विद्यापीठांमध्ये सुरू करण्याच्या सूचनाही उदय सामंत यांनी आज दिल्या आहेत. स्वामी रामानंद तीर्थ नांदेड विद्यापीठाने अशा प्रकारची लॅब सुरू केली आहे. यासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सर्व परवानगी तातडीने देण्यात येथील त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील इतर विद्यापीठांनी आपल्याकडे अशा प्रकारच्या लॅब सुरू कराव्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्य शासनाकडून सर्व परवानग्या देण्यात येतील अशी ग्वाही उदय सामंत यांनी दिली आहे.
 
आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी एनएसएसच्या विद्यार्थ्यांचीही मदत
आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी एनएसएसच्या विद्यार्थ्यांचीही मदत घेता येईल का याचा सर्व विद्यापीठाने विचार करावा. काही दिवसांपूर्वी सोलापूर विद्यापीठाने यासाठीचा एक प्रयोग सुरू केला आहे. एनएसएसच्या २७ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या आईवडिलांकडून परवानगी घेऊन हे विद्यार्थी आरोग्यसेवेच्या यंत्रणेसाठी सहकार्य करत आहेत. त्याच धर्तीवर राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये सुद्धा विद्यार्थी आरोग्य यंत्रणेच्या सेवेसाठी देता येतील यासाठीचा अहवाल तयार करावा अशा सूचनाही सामंत यांनी कुलगुरूंना केल्या.