कोणीही उपाशी राहणार नाही हा दृष्टीकोन ठेवून अंमलबजावणी करा - मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे

जनदूत टिम    04-Apr-2020
Total Views |

* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आढावा

 ठाणे : संचारबंदीच्या काळात हातावर पोट असणाऱ्या, मोलमजुरी करणाऱ्या, स्थलांतरीत नागरिकांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्थित सोय करा. ग्रामीण भागातील कोणताही नागरिक उपाशी राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी आज सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना केली. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तालुका निहाय आढावा घेतला.
 
Hiralal Sonawane_1 &
 
या आढावा बैठकीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब. भि. नेमाने तसेच पाचही पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आणि कोरोनाच्या पार्शभूमीवर पाचही तालुक्यात जिल्हास्तरावरील नियुक्त करण्यात आलेले संपर्क अधिकाऱ्यांशी मुख्य कार्यकारी अधिकारीसोनवणे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.
 
कोरोनामुळे सर्वत्र टाळेबंदी करण्यात आलेली आहे. या टाळेबंदीला ग्रामीण भागातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. ग्रामीण भागात मोलमजुरी करणारे, वीटभट्टीवर काम करणारे मजूर तसेच स्थलांतरी होणारे लोकं आहेत. या काळात हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ या नागरिकांवर येऊ नये यासाठी स्थानिक पातळीवर प्रशासकीय यंत्रणा, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती उत्तम सहकार्य करत आहेत. काही आदिवासी वाड्या-वस्त्यांवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अन्न धान्य वाटप, जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
 
ठाणे जिल्ह्यात कल्याण, मुरबाड, भिवंडी, शहापूर, अंबरनाथ आदी पाच ग्रामीण तालुके असून ४३० ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायात स्तरावर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या खबरदारीच्या उपायोज़ना करण्यात येत असून जिल्हा परिषद प्रशासनाच्या ग्रामस्तरीय सर्व कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती अहोरात्र कार्यरत आहेत.
 
सध्याच्या घडीला प्रदेशातून, परराज्यातून तसेच विविध जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना घरी अलगीकरण करण्यात आलेले आहे. या नागरिकांवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेँघे यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असणारी आरोग्याची टीम पूर्णतः लक्ष ठेवून आहे. टाळेबंदीमुळे अडकून राहिलेल्या बाहेरील राज्यातील, जिल्ह्यातील मजुरांसाठी निवासी केंद्र उभारण्यात आलेली आहेत. यामध्ये आजच्या घडीला शहापूर तालुक्यात आदिवासी आश्रमशाळा शिरोळ येथील निवासी केंद्रात ४६ नागरिक आहेत तर जोंधळे इंजिनियरिंग महाविद्यालयात ३१ जण राहत आहेत. तर मुरबाड तालुक्यातील तळवली आश्रम शाळेत ६२ जणांची सोय करण्यात आलेली आहे. याशिवाय नगरपंचायत क्षेत्रात ७१ जणांसाठी कुणबीहॉल आणि नमस्कार हॉल येथे राहण्या-खाण्याची व्यवस्थित सोय करण्यात आलेली आहे.
 
भविष्यात कोणतीही अडचण उद्भवू नये यासाठी इतर तालुक्यात देखील जिल्हा परिषद शाळां, संस्थात्मक शाळांमध्ये निवासी केंद्राची उभारणी करून ठेवण्यात आलेली आहे. अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायत क्षेत्रात रेल्वेत आणि अन्यत्र ठिकाणी छोट्या-मोठ्या वस्तू विकून उदरनिर्वाह करणाऱ्या तब्ब्ल १९८ नागरिकांची जेवणाची गैरसोय होऊ नयेसाठी वांगणी ग्रामपंचायतीने दोन वेळच्या जेवणाची सोय केली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिवसागणिक होणाऱ्या घडामोडींवर मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे लक्ष ठेवून आहेत. तसेच वेळोवेळी ते सर्वच यंत्रणाचा आढावा घेत आहेत.