मुंबई : स्वस्त धान्य दुकानांमधून आतापावेतो १ कोटी ५४ लाख ७१ हजार ७२८ शिधापत्रिका धारकांना ६७ लाख १४ हजार ७४० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांना या योजनेमधून सुमारे २० लाख ४० हजार ८४२ क्विंटल गहू, १५ लाख ७६ हजार १४९ क्विंटल तांदूळ, तर १९ हजार ४७४ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले. स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ८ लाख ३९ हजार १८१ शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दि. ३ एप्रिलपासून एकूण १ कोटी ३३ लाख २१ हजार ५७८ रेशनकार्ड ला मोफत तांदूळ वाटप करण्यात आले. या रेशनकार्ड वरील ६ कोटी ४ लाख २ हजार ८४५ लोकसंख्येला ३० लाख २० हजार १४० क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे.
शासनाने COVID 19 संकटावरील उपाययोजनेसाठी ३ कोटी ८ लाख ४४ हजार ७६ APL केसरी लाभार्थ्यांना मे व जून २०२० या २ महिन्यासाठी प्रती व्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप दि. २४ एप्रिल २०२० पासून सुरू होऊन आतापावेतो ७७ हजार ६१० क्विंटल धान्याचे वाटप केले आहे.