प्रत्येकाने जबाबदारीने वागा

जनदूत टिम    20-Apr-2020
Total Views |
करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन, तीन आठवड्यांपासून सुरू असलेली संचारबंदी आणखी तीन आठवडे वाढविण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला. त्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही संचारबंदी वाढविली होती. संचारबंदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था सांभाळणे वाटते तितके सोपे नाही, हे मंगळवारी अधोरेखित झाले. वांद्रे येथे घडलेल्या घटनेतून किती तरी महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत.

Corona002211_1   
सरकार व प्रसारमाध्यमे या दोहोंनी अशा आणीबाणीत आपापल्या जबाबदाऱ्या समजून घेऊन, त्या यथायोग्य कशा पार पडतील, याकडे तत्काळ लक्ष पुरवणे गरजेचे आहे. राज्यात व देशात संपूर्ण संचारबंदी असताना, परप्रांतातून आलेल्या कामगारांना त्यांच्या घरी परत जाण्यासाठी रेल्वे खास गाड्या सोडणार असल्याची अफवा कशी पसरली, ती पसरल्यानंतर एका ठरावीक वेळेत वांद्रे स्थानकाजवळ हजारो लोक कसे जमले, ते असेच जथ्थ्यांनी आले, की एक एक करत आले, इतके लोक जमा होईपर्यंत तेथील स्थानिक पोलिस यंत्रणा नक्की काय करत होती, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधून, त्यावर तत्काळ कारवाई न केल्यास, अशा घटना वारंवार घडण्याची भीती आहे.
 
एका मराठी वृत्त वाहिनीने रेल्वेच्या कुठल्याशा बैठकीचा दाखला देत, अशा गाड्या सोडण्यात येणार असल्याचे सांगून, गाड्यांचे 'जनसाधारण' असे नामकरणही केले. त्याच वृत्त वाहिनीच्या वेबसाइटवर या गाड्या महाराष्ट्रातील व मुंबईतील कुठल्या स्थानकांवरून सुटणार, याची यादीही आली. आता या जमलेल्या लोकांपैकी बहुतांश अमराठी असल्यामुळे, मराठी वृत्त वाहिनीवरील बातमी त्यांना कशी कळली, असला फाजील तर्क काही जण देत आहेत. आज माध्यमांपेक्षा समाज माध्यमांची ताकद किती तरी पटींनी वाढली आहे. बातम्या कुठल्याही भाषेतून, कुठल्याही भाषेत क्षणार्धात भाषांतरित होऊन, लाखो नव्हे, कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचण्यास काही मिनिटेही लागत नाहीत. शहानिशा केल्याशिवाय अशा बेजबाबदार बातम्या तयार करणे, त्यानंतर आपणच ती बातमी 'ब्रेक' केल्याच्या थाटात, घराबाहेर पडता येत नसल्याने अनेकांनी ती समाज माध्यमांतून हजारो नव्या लोकांपर्यंत पोहोचवणे, हा मुंबईसारख्या महानगरीतील कोट्यवधी नागरिकांच्या जिवाशी उघड उघड खेळ होता. ही अफवा पसरल्यानंतर इतक्या मोठ्या संख्येने लोक जमा कसे झाले, हा यातील सगळ्यांत कळीचा मुद्दा आहे. इतर वेळी पत्रकारांवरही बळाचा वापर करणारे पोलिस, सध्या तर इतके जागरूक आहेत, की भाजी किंवा औषधासाठी बाहेर पडणाऱ्यांनाही दंडुक्याचा प्रसाद खावा लागत आहे. अशा कर्तव्यदक्ष पोलिसांना हजारो लोक जमा होत असल्याचे दिसले नाही, की दिसून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, याची चौकशी होणे गरजेचे आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांनी दंडुक्याला तेल लावून ठेवावे, बाहेर पडणाऱ्यांना नागरिकांना त्याशिवाय जरब बसणार नाही, अशा आशयाचे विधान मध्यंतरी केले.
आता देशमुखांनी लावायला सांगितलेले ते तेल कुठल्या हवेत विरून गेले?
 
कुणी एका दुबे नामक व्यक्तीने, फेसबुकवरून उत्तर भारतीय कामगारांना घरातून निघून रेल्वे स्थानकांकडे जाऊन धरणे धरण्याचे आवाहन केले होते. गरीब कामगारांना संचारबंदीमुळे काम नाही. त्यात बहुतेक रोजंदारीवर काम करणारे श्रमिक आहेत. काम नसल्याने पैसे नाहीत व पैसे नसल्याने पोटातील आग विझवण्याची पंचाईत, अशा दुष्टचक्रात हे हतबल कष्टकरी सापडले आहेत. अशा प्रसंगी परक्या शहरात, आपल्याच राज्यातील कुणी तरी संघर्षासाठी आवाहन करत असल्यास, त्याचे आकर्षण या वर्गाला वाटण्याचा धोका मोठा आहे. या दुबेची फेसबुकवरील संबंधित चित्रफीत हजारो लोकांनी आपापल्या पानांवरून पुढे पसरवल्याचे आकड्यांवरून दिसते. त्या व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केली असली, तरी मुळात पोलिसांच्या सायबर विभागाला अशा गोष्टी वेळेत का कळत नाहीत? तशी क्षमता पोलिस दलात नसल्यास, या क्षेत्रातील तज्ज्ञ तरुणांचा सल्ला घेण्यास काय हरकत आहे? मुळात रोजंदारीवर जगणाऱ्या या गरीब श्रमिकांना आपल्या मूळ गावी परतण्याची इतकी घाई का झाली, हा प्रश्न आहे. करोनाचा संसर्ग झाल्यास त्यातून मृत्यू ओढावू शकतो, या भीतीपोटी संपूर्ण देश घरी बसला आहे.
 
समाजातील एका घटकाला करोनाच्या आधीच भुकेमुळे मृत्यू होण्याची भीती वाटू लागल्यास, त्यावर मात करण्यासाठी करत असलेली धडपड ही मूलभूत मानवी भावना आहे, हे समजून घ्यावे लागेल. सरकारने या कामगारांच्या दररोजच्या जेवणाची व्यवस्था वेगवेगळ्या माध्यमांतून केलेली आहे. काही ठिकाणी योग्य तो शिधा वा शिजवलेले अन्न त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. अनेक ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी वा त्यांच्या कार्यकर्त्यांद्वारे ही मदत देण्यात येत आहे. परप्रांतातून आलेले बहुसंख्य श्रमिक हे येथील मतदार नाहीत; त्यामुळे या मदतीच्या वाटपात त्यांचा क्रमांक लागला तर शेवटचाच. करोना परदेशातून आलेल्यांद्वारे भारतात आला असला, तरी त्याचा प्रसार गरिबांद्वारेच अधिक होईल, असे अनेकांच्या नेणिवेत कुठेतरी रुजलेले असल्याने, या वर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही अत्यंत हिणकस आहे. करोनाच्या निमित्ताने पूर्वी कधीही न पाहिलेल्या संकटाला तोंड देताना, समाजातील प्रत्येक घटक जबाबदारीचे भान व इतरांप्रती भ्रातृभाव बाळगणार नसेल, तर लढाई अधिकच जटील होत जाणार, यात काहीच शंका नाही.