मुंबई : कोरोनामुळे उद्योग क्षेत्रापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्या सोडवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली.
संचारबंदीच्या काळात उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी सीआयआय (कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिज) च्यावतीने विविध उद्योग समूहांच्या प्रमुखांसोबत उद्योगमंत्र्यांच्या व्हीडिओ कान्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देसाई बोलत होते. यावेळी देसाई म्हणाले की, देशात संचारबंदी जारी झाल्यानंतर उद्योग क्षेत्रातील समस्या जाणून घेण्यासाठी उद्योग विभागाने तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. यामध्ये उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे तसेच एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांचा समावेश आहे. उद्योजकांच्या सूचना आणि समस्या सोडवण्यासाठी माझ्यासोबत हा गट सतत कार्यरत आहे.
दरम्यान, कोरोना संकटानंतर उद्योग क्षेत्रापुढे मोठे आर्थिक संकट निर्माण होण्याची भीती आहे. त्यावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन मार्ग काढण्याची गरज आहे. याकामी राज्य शासन उद्योजकांसोबत असल्याचे देसाई यांनी सांगितले.
सीआयआय (कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंटस्ट्रिज) च्यावतीने या चर्चासत्राचे आय़ोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे तसेच एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, सीआयआयचे महाराष्ट्राचे संचालक अरविंद गोयल, गोदरेज, एल ॲन्ड टी, के.ई.सी. पॉलीकॅब, सॅमी हेवी इंडस्ट्रीज, जॉन्सन कंट्रोल, स्कोडा, फोक्सवॅगन व महिंद्रा आदी नामांकित कंपन्यासह इतर कंपन्यांचे १७० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.
विविध उद्योग समूहांच्या प्रमुखांनी संचारबंदीच्या काळात येणाऱ्या अडचणी
रब्बी हंगामाच्या अनुषंगाने शेती अवजारे, कीटकनाशके, खते, कृषीपंप यांचा पुरवठा करण्याची परवानगी द्यावी.
संरक्षण दलास लागणाऱ्या साधानांच्या उत्पादनासाठी परवानगी द्यावी.
निर्यातीचे व्यवहार सुरू करण्यास परवानगी मिळावी
आयटी क्षेत्रातील कर्मचऱ्यांना प्रवास करण्याची परवानगी द्यावी.
दरम्यान, या सर्व मागण्याचा साकल्याने विचार करून त्यावर मार्ग काढण्याची ग्वाही देसाई यांनी दिली