गोरगरीबांसाठी १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज - निर्मला सीतारामन

जनदूत टिम    26-Mar-2020
Total Views |
नवी दिल्ली :  प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला लॉकडाउनचा निर्णय योग्यच आहे. मात्र या कालावधीत हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.

Nirmala_1  H x  
 
गरीबांना पाच किलो गहू किंवा तांदूळ १ किलो डाळ मोफत मिळणार. पुढील तीन महिन्यांसाठी ही योजना असणार आहे. अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली. एकही गरीब माणूस उपाशी झोपणार नाही याची काळजी आम्ही सराकर म्हणून घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. देशातील ८० कोटी लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
देशात कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी आम्ही सरकार म्हणून घेत आहोत असंही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. आशा वर्कर, नर्सेस आणि आरोग्य विभागात काम करणाऱ्यांना ५० लाखांचं विमा संरक्षण देण्यात येणार असल्याचंही सीतारामन यांनी जाहीर केलं. देशभरातील २० लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 
 
अन्नदात्यासाठी महत्त्वाची तरतूद
अन्नदाता अर्थात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची तरतूद करण्यात येणार आहे. ८ कोटी ७० लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत. एप्रिल महिन्यात हे पैसे खात्यांवर जमा केले जातील असंही अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत हे पैसे जमा केले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शेतकरी, मनरेगा कर्मचारी, विधवा, दिव्यांग ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे. असंही आजच्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलं.