कोरोनाला गावाबाहेरच रोखण्यासाठी कोल्हापुरच्या नूल गावाचा धाडसी निर्णय!

गुरूप्रसाद कुलकर्णी    25-Mar-2020
Total Views |
सोलापूर : जमावबंदी, संचारबंदी अशा उपाययोजनांना न जुमानता बाहेर पडणाऱ्या नागरिकांसमोर कोल्हापुरातल्या एका गावानं आपत्कालीन स्थितीआधीच कठोर उपययोजनांची अंमलबजावणी कशी करायची याचा आदर्श घालून दिला आहे. गडहिंग्लज तालुक्यातील नूल या गावातील लोकांनी गावाच्या सीमा बंद करून गावबंदी केली आहे. कोरोनाला गावाबाहेरच रोखण्याचा निर्धार या गावकऱ्यांनी केला आहे.
 
solapur_1  H x
 
कोरोनाचं संकट संपूर्ण जगात फैलावलं आहे आणि जगातील बहुतांशी देशांनी लॉकडाऊन केलं आहे. देशभरातही ३२ राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तरीही अनेक ठिकाणी नागरिक रस्त्यावर दिसत आहेत. आपत्कालिन स्थितीत जी खबरदारी घ्यायला हवी त्या नागरी शिस्तीचा अभाव काही ठिकाणी दिसत असताना कोल्हापुरातील नूल गावातील गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावाच्या सीमा सील केल्या आहेत. गावातील कुणीही व्यक्तीनं गावाबाहेर पडायचं नाही आणि गावाबाहेरील कुणीही व्यक्तीला गावात प्रवेश द्यायचा नाही, असा कठोर निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.
 
गावाची सीमा सील करताना गावकऱ्यांनी मोठमोठे दगड आणि मोठमोठी लाकडं रस्त्यावर आडवी ठेवली आहेत. त्यामुळे कोणतंही वाहन गावात येऊ शकणार नाही, याची व्यवस्था गावकऱ्यांनी केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्यभरात शाळा, कॉलेज बंद करण्यात आले. कार्यालयंही बंद करण्यात आली. मुंबईसह अन्य शहरांत लॉकडाऊन करण्यात आलं. सर्वांना घरीच राहायचे असल्यानं मुंबई, पुण्यासह शहरांत राहणाऱ्या अनेकांनी आपआपल्या गावी जाणं पसंत केलं. त्यामुळे गावाकडे येणाऱ्या लोकांचा ओघ वाढला.
 
शहरांतून येणाऱ्या लोकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून पोलिसांनीही आता जिल्ह्यांच्या सीमा सील केल्या आहेत. पण नूल गावच्या ग्रामस्थांनी त्यापुढे जात गावाच्या सीमाही सील केल्या आणि कोरोनाविरुद्ध लढ्यात सरकारनं केलेल्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले. गावातील सरपंच, पोलीस पाटील आदी पदाधिकारी आणि नागरिक एकत्र आले आणि त्यांनी हा निर्णय घेतला आहे. कोरोनाचं महासंकट रोखायचं असेल तर नागरिकांना आता सरकारच्या आदेशांची अशीच कठोर अंमलबजावणी करावी लागणार आहे.