सुकमा नक्षलवादी हल्ला भ्याड; शहिद जवांनाना श्रध्दांजली - उपमुख्यमंत्री अजित पवार

जनदूत टिम    23-Mar-2020
Total Views |
मुंबई: छत्तीसगडच्या नक्षलप्रभावीत सुकमा जिल्ह्यात सुरक्षा जवानांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले आहेत. ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. देश ‘करोना’ संकटाचा सामना करत असताना नक्षवाद्यांचे हे कृत्य अत्यंत भ्याड आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेच्यावतीने शहिद जवानांना श्रध्दांजली अर्पण करत असल्याची प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

pawar_1  H x W: 
 
छत्तीसगड राज्यालाही कायमच नक्षलवादाचे मोठे संकट आहे. या राज्यातील सुकमा जिल्ह्यात पोलीस जवानांच्या गटावर नक्षलवाद्यांनी शनिवारी अचानक छुपा हल्ला केला. यामध्ये १७ जवान शहिद झाले. या शहिद जवानांमध्ये जिल्हा राखीव दलाचे (डीआरजी) १२ जवानांचा समावेश आहे. स्थानिक मुलांची भरती असलेल्या या जिल्हा राखीव दलाचे जवान इतक्या संख्येत शहिद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या १४ जवानांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होईल, अशी प्रार्थना करतो.
देश ‘कोरोना’च्या संकटाशी सामना करत असताना, नक्षलवाद्यांनी केलेल्या या भ्याड कृत्याचा मी निषेध करतो. नक्षलवाद ही संपूर्ण देशासमोरील मोठी समस्या असून या लढ्यात महाराष्ट्र शासन छत्तीसगड सरकारच्या कायमच बरोबर आहे. या निमित्तानं महाराष्ट्रातही नक्षलप्रभावीत भागात योग्य ती खबरदारी घेतली जाईल. या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना राज्याच्या जनतेच्यावतीने मी श्रध्दांजली अर्पण करत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.