शिंदेसाहेबांमुळेच ३५ गावच्या योजनेला मिळाली मान्यता:- नितीन नागणे

जनदूत टिम    20-Mar-2020
Total Views |
पंढरपूर: पंढरपूर - मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी ३५ गावच्या उपसा सिंचन योजनेला तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे साहेब यांच्यामुळेच मान्यता मिळाली असून कॉंग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री असतानाच त्याला पुर्वी १ कोटी रूपयांचा टोकन निधीही मिळालेला आहे. त्यामुळे ३५ गावच्या उपसा सिंचन योजनेला केवळ शिंदेसाहेबांमुळेच मान्यता मिळाली असल्याचे मत सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी व्यक्त केले.
 
Nitin nagane_1  
 
नितीन नागणे पुढे म्हणाले की, सुशिलकुमार शिंदे हे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे तेव्हा खासदार असल्यामुळे त्यांचे विशेष लक्ष त्यांच्या मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावच्या उपसा सिंचन योजनेकडे होते. या भागातील परिस्थिती जावून घेवून या ठिकाणी पाणी आले पाहिजे याबाबत त्यांनी ठोस भूमिका घेतलेली होती. यामुळेच त्यांनी या योजनेसाठी केंद्रीय स्तरावरून पाठपुरावा केल्यामुळे या योजनेला असणारी अनुशेषाची मुख्य अडचण वगळून त्याला विशेष बाब म्हणून मान्यता तत्कालीन राज्यपाल यांच्याकडून घेतलेली आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांचा महत्वाचा पाणी प्रश्न मार्गी लागण्यासाठी योजनेला मंजूरी मिळालेली असल्यामुळे याचा विचार होण्याची गरज आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांमुळेच या योजनेला मंजूरी मिळाली असल्याचे नितीन नागणे यांनी सांगितले.
प्रोटोकॉल मोडून शिंदेसाहेब राज्यपालांच्या भेटीला
राज्यपाल महोदय यांची नियुक्ती ही केंद्र सरकारच्या गृह खात्याकडून होत असल्याने केंद्रीय मंत्री त्यांना राजभवनात भेटावयास येत नसतात. मात्र तेव्हा आपल्या मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावच्या उपसा सिंचन योजनेचा महत्वाचा प्रश्न असल्यामुळे शिंदे साहेब यांनी प्रोटोकॉल मोडून तत्कालीन राज्यपाल यांची भेट घेवून या योजनेला मान्यता देण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यामुळेच सदरची योजना विशेष बाब म्हणून अनुशेषामधून वगळून त्याला मान्यता दिली असल्याचे ही नितीन नागणे यांनी सांगितले.