कोरोना व्हायरस : NRC, CAA आंदोलनाला फटका

जनदूत टिम    18-Mar-2020
Total Views |
मुंबई : सीएए, एनआरसी आंदोलनालाही कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात दिल्लीतील शाहीनबाग आंदोलनाच्या धरतीवर साखळी आंदोलन सुरू आहे. मात्र, कोरोना व्हायरसचे संकट दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अनेक रेल्वे, चित्रपटगृह, मॉल्स, मोठमोठी हॉटेल्स यांना बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. तर, मुंबईसह पुणे शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यात सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढता धोका पाहता ही आंदोलने मागे घ्यावीत यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू होते.
 
caa_1  H x W: 0
 
कोरोनाची दहशत आणि सीएए विरोधी आंदोलन
नागपाडा आंदोलानाला ५० पेक्षा अधिक दिवस झालेत. कोरोनाची भिती असताना देखील सीएएच्या विरोधात हे आंदोलन उद्याप सुरूच आहे. हिंगोलीत जमाव बंदीचे आदेश झुगारुण शेकडो लोक एकत्र आलेत. मोठ्या जमावाने शाहीनबाग आंदोलन सुरुच ठेवले आहे. बीडमधील परळीच्या शाहीनबाग आंदोलनालाही ५० हून अधिक दिवस झालेत. तरीही कोरोनाच्या भितीतही आंदोलनकर्त्यांच आंदोलन सुरुच आहे. दरम्यान भिवंडी आणि उस्मानाबाद येथील आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन काही दिवसांसाठी स्थगित केलं आहे.
 
उस्मानाबादमधील आंदोलन काही दिवसांसाठी स्थगित
नागरिकत्व कायदा एनपीआर आणि एनआरसी याच्याविरोधात उस्मानाबादमध्ये चाळीस दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. संविधान बचाव समितीच्या वतीने हे आंदोलन सुरू होतं. आजचा आंदोलनाचा ४४ वा दिवस होता. कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये यासाठी संविधान बचाव समितीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला. हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे.
सीएए, एनसीआर विरोधात मालेगाव मधील खलीलशेठ कंपाऊडमध्ये शाहीनबाग आंदोलनाला समर्थन देण्यासाठी गेल्या ५३व्या दिवसापासून सुन्नी कॉन्सिल तर्फे महिलांचे आंदोलन सुरू आहे. राज्यात कोरोनाची उद्भवलेली परिस्थिती पाहता सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे मालेगावमधील महिलांचे सुरु असलेले आंदोलन मागे घ्यावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे यासाठी तहसीलदारांनी आंदोलनकर्त्या महिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोपर्यंत सीएए, एनआरसी विधेयक मागे घेतले जात नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं स्पष्ट केल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला होता.
 
भिवंडी शहरातील शाहीनबाग रात्रीचं आंदोलन स्थगित
कोरोना व्हायरसचा संसर्ग संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर फैलावू लागला आहे. त्यामुळे राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. ज्यामध्ये अनावश्यक गर्दी टाळण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले असल्याने भिवंडी शहरात ४८ दिवसांपासून सुरु असलेलं शाहीन बाग आंदोलन अंशतः स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी महिला या ठिकाणी थांबणार नाहीत. फक्त दिवसभर काही मोजक्या महिला या ठिकाणी थांबणार आहेत. यावेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व काळजी घेत हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली आहे.