भिवंडी : तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावर असलेल्या मानकोली ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या हर्षदा अरविंद माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माणकोली ग्राम पंचायतीचे मावळते सरपंच श्रीकृष्ण नामदेव माळी यांनी आपसात ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्या नंतर त्यांच्या रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी सोमवारी माणकोली ग्रामपंचायत येथे अध्यसी अधिकारी आय. जी. काळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी हर्षदा माळी यांचा एकमेव अर्ज आल्याने पीठासीन अधिकारी काळे यांनी हर्षदा माळी यांची सरपंच पदी नियुक्ती जाहीर केली.
माळी यांची सरपंच पदी नियुक्ती होताच त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडत आनंद व्यक्त केला. नवनिर्वाचित शिवसेनेच्या सरपंच हर्षदा माळी यांना शुभेच्छा देण्यासाठी मा.आमदार रुपेश म्हात्रे, जिपचे बांधकाम समितीचे माजी सभापती सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे, जिप.गटनेते कुंदन पाटील,पं.स.सदस्य विकास भोईर, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख चक्रधारी पाटील, ग्राम विकास अधिकरी एम बी परमार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान '' गावकऱ्यांनी माझ्यावर सोपविलेली जबाबदारी मी यशस्वी पाने पार पडणार असून ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना सोबत घेऊन गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे '' अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सरपंच हर्षदा माळी यांनी दिली आहे .