कोरोनामुळे नागरिकत्व कायद्याविरोधात भिवंडीतून निघणाऱ्या लॉग मार्चला तात्पुरती स्थगिती

जनदूत टिम    16-Mar-2020
Total Views |
भिवंडी : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात जिल्ह्यातील संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी १६ मार्च रोजी भिवंडीतील रांजनोली नाका ते विधानभवनावर लॉग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांसह नागिरकत्व संशोधन उपसमितीच्या सदस्यांच्या झालेल्या बैठकीत कोरोनाचा फैलाव होण्याच्या भीतीने संविधान बचाव संघर्ष समितीच्या लॉग मार्चला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याची माहिती भिवंडी संविधान बचाव संघर्ष समितीचे निमंत्रक ऍड किरण चन्ने यांनी दिली आहे. केंद्र शासनाने नागरिकत्व सुधारणा कायदा ,राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी व राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी कायदा देशभर लागू केला आहे.
 
Bhiwandi Morcha_1 &n
 
त्यामुळे देशभर या कायद्याला विरोध होऊन भाजप सरकार देशातील नागरिकांच्या मुळ समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून येथील नागरिकांना जनसुविधा देण्याऐवजी केवळ जाती धर्माचे राजकारण करीत असल्याचा आरोप संविधान बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या समितीच्या वतीने मुंबई - नाशिक मार्गावरील राजनोली नाका येथून सोमवारी १६ मार्च रोजी लॉग मार्च काढण्यात येणार होता. यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लॉग मार्चमध्ये लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहावे, यासाठी ठाणे जिल्हयात विविध शहरात बैठका घेऊन जय्यत तयारी केली होती.
 
मात्र कोरोनाच्या सावटामुळे राज्यात सर्वच सर्वजनिक कार्यक्रमावर राज्य शासनाकडून बंदी घालण्यात आहे. या पार्शवभूमीवर सह्यांद्री अतिथीगृहात ठाणे जिल्ह्यातील संविधान बचाव संघर्ष समितीचे पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपसमितीचे सदस्य, तथा मंत्री जितेंद्र आव्हाड यांची लॉग मार्च संबधी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी एनपीआर संदर्भात राज्य शासनाने एक उपसमिती तयार करण्यात आली असून या उपसमितीने ३० मार्चपर्यत लॉग मार्चला तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती दिली असून कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, १६ मार्चला निघणारा लॉग मार्च रद्द केल्याची सहमती बैठकीत झाली आहे.
 
दरम्यान, मुख्यमंत्री, आणि उपसमितीचे सदस्य तथा मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी केलेल्या चर्चा अंती ठाणे जिल्हा संविधान बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपसमितीचा पुढील अहवाल येईपर्यत आंदोलन स्थगित करीत असल्याचे सांगितले. यावेळी संविधान बचाव संघर्ष समितीचे शामदादा गायकवाड, सुरेश पाटील, रमीज़ फाल्के, ऍड किरण चन्ने, विजय कांबळे, मुफ़्ती हुजैफा, मौलाना अवसाफ फलाही, फ़ाज़िल अंसारी, इंजीनियर जावेद, शादाब उस्मानी, गफ्फार शेख, मोहम्मद अली आदी पदाधिकारी उपस्थित होते.
 
याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भिवंडी शहरातील शिवाजी चौक रस्त्यावरील हाफीजी बाबा दर्गा याचा उरूस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असताना सध्या सुरु असलेल्या करोना व्हायरस च्या प्रदुर्भावा नंतर महाराष्ट्रात लागण झालेले सर्वाधिक रुग्ण आढळण्यास सुरवात झाली आहे त्या मुळे सर्व शासकीय यंत्रणा स्वयंसेवी संस्था जनजागृतीसाठी पुढे सरसावत असताना भिवंडी शहरातील हाफीजी बाबा दर्गा उरूस कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय पोलीस व विश्वस्त मंडळाच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.