मुंबई : राज्यात येत्या २० एप्रिल पासून मेगा भरती होणार असल्याची घोषणा राज्य शासनाने केलेली आहे. राज्यातील शासकीय विभागांमधील जवळपास दोन लाख पदे रिक्त असल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने नोकरभरतीचा मुहूर्त ठरवला आहे. येत्या १५ एप्रिलपर्यंत खाजगी एजन्सी नियुक्त करुन २० एप्रिलपासून मेगाभरतीला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित गृह, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, जलसंपदा, कृषी व पशुसंवर्धन, महसूल व वने, महिला व बालविकास या विभागांमध्ये सर्वाधिक रिक्त पदे असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रशासकीय विभागांमधील रिक्त पदांची संख्या आता दोन लाखांवर पोहोचली असून, माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती समोर आली होती. त्यानंतर प्रशासनामध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत. यासाठी एक लाख एक हजार पदांची आरक्षण पडताळणीही पूर्ण करण्यात आली आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करुन खासगी एजन्सीमार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाआयटी विभागाच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. महाआयटी विभागातर्फे दोन दिवसात आरएसपी प्रसिद्ध केली जाणार असून नामांकित एजन्सीकडून प्रस्ताव मागवले जाणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे.